हिंदू नव वर्षाचा शुभारंभ-चैत्री पाडवा

हिंदू नव ववर्षाचा शुभारंभ-चैत्री पाडवा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

हिंदू पंचांगानुसार शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस, “चैत्री पाडवा” या नावाने प्रसिध्द आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला पाडवा हा सण आपल्याकडे मोठ्या थाटामाटात आणि श्रध्दापूर्वक साजरा केला जातो. धर्मशास्त्रानुसार दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. अशी गुढी उभारल्याने मांगल्य आणि आनंद यांच्या लहरी वातावरणात निर्माण होऊन एक सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते. याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध केला आणि त्याच्या अत्याचारातून तिथल्या प्रजेला मुक्त केले. तोच हा विजयोत्सवाचा दिवस. वालीसारख्या आसुरी शक्तींचा प्रभू रामचंद्राने आपल्या दैवी शक्तीने नाश केला, सुष्टांनी दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचं गुढी हे सूचक आहे.

नव्या को-या जरीच्या रेशमी कापडाचा खण किंवा साडी साधारण 5 फूट लांब बांबूच्या काठीला गुंडाळून, गुढी तयार केली जाते. गुढीची काठी ही खास फक्त बांबूच्याच झाडाची वापरली जाते. कडुलिंबाचा कोवळ्या पानांचा ढगळा, साखरेची गाठी, फुलांचा हार, मोग-याचा गजरा अशा सर्व ऋतुजन्य वस्तूंनी सजवून, त्यावर चांदीचा किंवा तांब्या-पितळेच्या धातूचा गडू काठीच्या टोकावर झाकून तयार केलेली गुढी घरावर उंच ऊभारावी.

अर्थात गुढी ऊभारण्याचे पवित्र काम स्नान करून शुचिर्भूत होऊनच करायचे आहे. सर्व कुटुंबाने गुढीला औक्षण करून, विधीवत पूजन करावे. गुढी ऊभारण्यासाठी ठराविक असा मुहूर्त नसतो, परंतु शक्यतो सकाळी लवकरात लवकर, म्हणजे साधारण आठ वाजता गुढी ऊभारणे आणि सूर्यास्ताला गुढी उतरवणे असे शास्त्र आहे. घरावर उंच ऊंच गुढी ऊभारायची असते, पण तशी जागा नसेल तर देवघरात देवापाशीही गुढी स्थापन केली तरी चालते. धर्म ध्वजा फडकावणे, ही आपली जुनी प्रथा आहे, त्यानुसार ही संपन्न परंपरा आपण साजरी करतो. कडूनिंबाच्या वृक्षामधले औषधी गुणधर्म अनेक व्याधीं दूर करण्यास उपयुक्त आहेत. हा कडू रस आरोग्यास मात्र गोड फळ देणारा म्हणून सिध्द झालेला आहे. उन्हाळ्यात थंडावा आणि शीतलता मिळण्यासाठी कडूनिंबाच्या कोवळ्या पानांबरोबर जिरे व गूळ यांच्या मिश्रण करून ते खाऊनच पाडव्याच्या दिवसाची सुरवात करायची असते. त्या पाठीमागे आरोग्य सुदृढ राखण्याचे शास्त्रीय कारण आहे.

आपल्याकडे शुभ मानल्या जाणा-या साडेतीन मुहूर्तापैकी एक, असा पाडवा हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त आहे. या निमित्त घरात नविन वस्तूंची खरेदी करणे, सोने-चांदी, दागिने, घर अशा मौल्यवान वस्तू घेतल्याने त्याचे फल अनेक पटींनी वाढते, अशी श्रध्दा आहे.म्हणूनच पाडव्याला नवीन उपक्रम, नवे संकल्प, नवे व्यवसाय उद्योग यांचाही शुभारंभ आवर्जुन करण्याची जुनी प्रथा आजही प्रचलीत आहे.

आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणांमागे ऋतुनुसार आहार विहार व वर्तन परंपरा यांचे महत्व सांगितलेले आहे. आपल्या ऋषी मुनींनी त्याचे शास्त्रार्थ घालून दिले आहेत. त्यानुसार आपल्या पूर्वजांनी सर्व परंपरा रूढी व प्रथा जपल्या.

आता पुढच्या पिढ्यांनीही या मौल्यवान परंपरा जपायला हव्यात. सण साजरे करताना त्यातील सखोल अर्थ आणि त्यामागे असलेले विज्ञान याचे महत्वं जर समजून घेतले तर सण अधिकच उत्साहाने साजरे होतात, अशी माहिती श्री. प्रसाद देशमुख गुरूजी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. यंदाचा पाडवा व नवे संवत्सर सर्वांना शुभ फल देणारे होवो, अशी सदिच्छा व्यक्त करून गुरूजीनी सर्व वाचकांना मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles