सण-उत्सवांचे बदलते रूप
“उत्सव प्रिय: खलु मनुष्य:” असे महाकवी कालिदास यांनी म्हटले आहे. आणि ते निरंतर बरोबरच आहे. विश्वात शोभून दिसणारा भारत देश ही एक पुण्यभूमी आहे. इथे अनेक देव-देवतांनी अवतार घेतले आहेत.अनेक ऋषीमुनींनी गिरी-शिखरावर, तरुतळी, नदी तिरी बसून वर्षांनुवर्षे तपश्चर्या केली व त्यामुळेच इथे असलेली आर्य संस्कृती, त्यातून निर्माण झालेली श्रद्धा आणि ती व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी जणू सण-उत्सवांची योजना केली गेली. सण उत्सवांनी मानवी जीवनास परिपूर्ण आनंदाची पर्वणी, एकतेचा संस्कार, चैतन्यमय अशी मंगल इच्छा मिळते. सांस्कृतिक, अध्यात्मिक, धार्मिक कारणांनी साजरे होणारे दिवस म्हणजे सण-उत्सव. पुढे ते सामाजिक होत गेले.लोकमान्य टिळकांसारख्या महान नेत्यांपासून तर या उत्सवांना राजकीय व राष्ट्रीय भावनेतून जनजागृतीचे स्वरूप प्राप्त झाले.आणि आज तर या इंटरनेटच्या युगात ते ‘वैश्विक’ झाले आहे.
माणसाला आयुष्यात जो शांतपणा, स्वास्थ्य हवं असतं, ते या सणांमधून त्यांना प्राप्त होत असतं. नातेसंबंधांची जपणूक सकारात्मक ऊर्जा, मानवी संबंध,भक्ती, अध्यात्म ऊर्जा, निसर्गाशी जवळीक, भूतदया या गोष्टी देखील इथे जोपासल्या जातात. ‘आपली संस्कृती ही आपल्याला कृतज्ञता शिकवते’म्हणूनच तर प्रत्येक सण उत्सवात याचेच औचित्य साधून आपण सण साजरे करतो. आपल्याकडे ‘सणांचा राजा म्हणजे दिवाळी’ अगदी बुद्ध काळापासून तो आपल्याकडे साजरा केला जात आहे. विश्वबंधुत्वाची जाणीव करून देणारी राखी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, बैलपोळा, गणेशोत्सव, दसरा नागपंचमी, संक्रांत, होळी गुढीपाडवा
15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखे राष्ट्रीय उत्सव राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी सार्वजनिक होऊ लागले.ज्ञानाला विज्ञानाची, विज्ञानाला अध्यात्मिकतेची, आध्यात्मिकतेला श्रद्धा आणि भक्तीची जोड देऊन प्रसार माध्यमे इंटरनेटच्या माध्यमातून आपले भारतीय उत्सव वैश्विक करू लागले. समाज सुधारक ज्येष्ठ नागरिकांच्या यांच्या द्वारे त्याला नैतिक पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे आज आपला भारत देश संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करणारा सांस्कृतिक श्रेष्ठत्व सिद्ध करणारा देश…विश्वात उज्वल ठरला आहे.म्हणूनच तर “बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ||” हे गीत सार्थ झाल्याची सार्थकता प्रत्येकाला वाटू लागली आहे. ताण-तणावांना देऊनी फाटा सण उत्सवांची मजा लुटू या.माझा भारत श्रेष्ठ भारत करण्यासाठी सज्ज होऊ या येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवा साठी मनःपूर्वक शुभेच्छा…!
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
==================