किल्ले सिद्धगड
सन १९४३ साली हुतात्मा वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानामुळे हा गड प्रसिद्धीस आला. १६९० पर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता. गडावरील गुहा १००० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे शिलाहारांनी हा किल्ला बांधला असेही म्हटले जाते. सिद्धगडाचे उत्तुंग रूप गिरीप्रेमींना नेहमीच भुरळ घालते. सिद्धगडाची माची किंवा सिद्धगड वाडी सुमारे दोन हजार फूट उंचीवर आहे. हा आहे किल्ल्याचा पहिला भाग. माचीवरील प्रवेशद्वार ओलांडले की मग सुरू होतो शिखरमाथा म्हणजे बालेकिल्ल्याचा भाग. समुद्रसपाटीपासून ३२३६ फूट उंच असलेला हा बालेकिल्ला दुपाकी घराच्या छपरासारखा निमुळता होत गेलेला आहे. समोर सह्याद्रीची उंच कातळ भिंत व दुसरीकडे खोल उतरत जाणारी दरी त्यामुळे चढाई करताना सिद्धगड अधिकाधिक रौद्र भासतो.
सिद्धगडाच्या पायथ्यापासून अडीच तीन तासांत आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. भवताली संपन्न निसर्ग व सुस्थितीत असलेला चिरेबंदी दरवाजा पाहून मन प्रसन्न होते. पायथ्याशी दाट झाडीत श्री नारमातादेवीचे प्राचीन मंदिर लक्ष वेधून घेते. तिचे दर्शन घेऊन आपण पोहचतो ते सिद्धगडवाडीत. इथून पुढे वाटचाल सुरू होते ती बालेकिल्ल्याची. गडावर पडक्या मंदिरात आभाळाच्या छताखाली शिवलिंग आहे. समोरच नंदी आहे. इथून पश्चिमेकडे जाताना कमान दिसते. तिच्या आत घरांचे चौथरे व भग्न अवशेष आहेत. तसेच पश्चिम टोकाशी बुरूजाचे अवशेषही आढळतात.
गडावर मुबलक पाणी आहेत. खोदलेले अनेक कुंड आहेत. येथून अनेक किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. गणपती, कार्तिकेय व शिवपरिवारातील विविध देवता, सतीशिळा व वीरगळ पहायला मिळतात. गडावर तटबंदी किरकोळ अवशेष रुपात आहे. चहूबाजूंनी तुटलेला भेदक कडा व खालून वर येणारा जोराचा वारा यामुळे येथे फिरताना कड्यापासून अंतर राखूनच चालावे. २ जानेवारी १९४३ मध्ये भाई कोतवाल व हिराजी पाटील या क्रांतिकारकांना इंग्रजांनी येथेच गोळ्या घातल्या. त्यांचे सिद्धगडवाडीच्या दक्षिण बाजूला बोरवाडीत हुतात्मा स्मारक आहे. येथे नतमस्तक होऊन परतीच्या प्रवासाला निघावे. सिद्धगडावर जाण्यासाठी ठाणे-मुरबाड बसने म्हसा धसईमागें उचले या गावी यावे लागते किंवा कल्याणमधून थेट धसई बसने उचले गावी उतरावे.
सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध