“मृगजळ: एक आभास भुलवणारा”; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
*मृगजळ ते हसणारे*
*दुरूनच लोभावणारे*
*जसा तू होतास जीवनात*
शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता प्रकाश किरणांच्या दिशेत उष्ण हवेत होणाऱ्या वक्रीकरणामुळे दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेस मृगजळ म्हणतात. मृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तना द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे दिसतात.
वास्तविक जीवन जगताना अनेक आव्हाने झेलावी लागतात. कधी प्रेमात फसवणूक, यशासाठी प्रयत्न करूनही अपयश पदरी पडते. एखादं स्वप्न जपून त्याच्या प्राप्तीसाठीअहोरात्र झटणं, पण पदरी निराशा येणं अशा परिस्थितीत जे यश ,प्रेम स्वप्नवत ठरतं त्याला ते मृगजळ ठरलं असं म्हटलं जातं.
तुझ्या प्रेमासाठी मी वेडी
वळणे आली वेडीवाकडी
पण तू मृगजळ ठरलास
सध्या संगणक क्रांती झाली.मोबाईलनं सारं जग जवळआलं.आभासी जगच खरं वाटू लागलं.घरी तरुण पिढीला आईवडिलांशी बोलायला वेळ मिळेना. नात्यांची घडी विस्कटली. मृगजळामागे धावून काय मिळालं?
*आभासाच्या मागे लागले*
*नाती आपली विसरले*
*मृगजळच वाटे आपले*
आज आपण बघतोय की प्रत्येक माणूस धाव तोय. कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही .पण ह्या जीवन प्रवासात माणूस काहीतरी गमावत चाललाय असं वाटत नाही का? हे लक्षात कसं येत नाही? जेव्हा लक्षात यायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते .पोटापुरते तर मिळाले पण अजूनही काहीतरी मिळेल का ह्या आशेने माणूस सारखा मृगजळामागे धावताना दिसतो. मृगजळ म्हणजे काय ? एखादी गोष्ट कायम आहे असा भ्रम व्हायला लागणे, वास्तवात नसणाऱ्या गोष्टीच्या मागे धावायला लागणे , माहीत नसलेल्या गोष्टींच्या मागे पडणे म्हणजे मृगजळ, खरंच माणसाचं समाधान होत नाही. कारण त्याची हाव संपणारी नसते.
*मृगजळामागे धावता*
*माणसा भान विसरता*
*शेवटी तुझी झोळी रिकामीच*
आंतरिक समाधान असावे लागते. नाहीतर नवनवीन इच्छा, आकांक्षा मनात निर्माण होतात. त्यांच्या पूर्ततेसाठी माणूस धावत राहतो.नाती विसरतो. यंत्रवत काम करतो.पण तो हे विसरतो ज्या सुखामागे तो धावतआहे ते अशाश्वत आहे. त्या शोधाच्या पाठीशी एक मृगजळ ठामपणे उभे आहे. ते मृगजळ हाती लागणारे नसतेच. फक्त भुलवत राहते.
आजच्या यात्रिवेणी काव्य स्पर्धेत नेहमी प्रमाणे आदरणीय राहुलसरांनी
‘मृगजळ’ हा विषय दिला आहे. जीवनाकडे बारकाईने बघावे, जीवनातील शाश्वत मूल्यांचा शोध घ्यावा. हाच उद्देश या मागे आहे. शिलेदारांनी पण प्रतिसाद चांगला दिला आहे. तरी तिसऱ्या ओळीच्या कलाटणीकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने त्रिवेणी काव्याचा आनंद घेता येईल. सर्व शिलेदारांचे मनापासून आभार
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*