“मंदिरांमधून मतदान जागृती”; मतदारांना आवाहन करणारे फलक
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. ठिकठिकाणी सर्व राजकीय पक्षांच्या सभा गाजत आहेत. प्रचारसभेतील या धुवाँधार भाषणांवर समाज माध्यमावर तितक्याच रंगतदार चर्चा सुरू आहेत. नुकतीच पुण्यात पंतप्रधान मोदीं आणि काँग्रेसचे राहुल गा॔धी यांच्या सभा झाल्या. या सभांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि विशाल जनसमुदायाचे चित्र प्रसार माध्यमातून लोकांना दिसले. पण सभेतली ही तुडूंब गर्दी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी केंद्रावर मात्र दिसत नाही.
दरवेळी नव मतदार वाढल्याचे आकडे प्रसिध्द होतात पण मतदानाची टक्केवारी हवी तितकी वाढत नसल्याची चिंता राजकीय नीतीज्ञ व्यक्त करीत आहेत. लोकशाही ख-या अर्थाने यशस्वी करायची असेल तर मतदान जास्तीत जास्त वाढले पाहिजे, अशीच सार्वत्रिक अपेक्षा आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील देवदेवेश्वर संस्थान यांनी आपल्या परीने मतदार जागृतीसाठी आपले योगदान देण्याच्या उद्देशाने संस्थानच्या अधिनस्त येणा-या मंदिरात मतदान जागृतीसाठी ‘मतदारांना आवाहन: करणारे फलक लावले आहेत.
पर्वतीवरील सर्व मंदिरे, रमणा गणपती, तळ्यातला गणपती, महालक्ष्मी मंदिर, दशभुजा गणपती, मृत्यूंजय मंदिर इत्यादी मंदिरे या अंतर्गत येतात. अशी माहिती देवदेवेश्वर संथानचे विश्वस्त जगन्नाथ लडकत यांनी दिली.
पुण्यात देवदर्शनाला रोज मंदिरात येणा-या भक्तांची संख्या भरपूर असून प्रांगणात दर्शनी भागात लावलेले हे फलक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात कुठलाही पक्षाचा प्रचार नसून मतदानाचा बहुमोल हक्क बजावण्यासाठी केलेले निरपेक्ष आवाहन आहे. मंदिर न्यासाने मतदार जागृतीचे उचलले हे पाऊल एक सामाजिक बांधीलकी म्हणून अनुकरणीय असल्याची चर्चा
आहे.