चैतन्यहीनांच्या जीवनातली तली रिद्धीमा
“येतील वादळे खेटेल तुफान,तरी मी चालते वाट
अडथळ्यांना येऊन थांबणे,पावलांना नाही पसंत..”
असंच काहीसं व्यक्तीमत्व असणाऱ्या निर्गुणाला आकार देणाऱ्या शिक्षिकेची कहाणी वाचली आणि मन सुन्न झालं.. अबोध मनाची अनाकलनीय भाषा असणाऱ्या निर्गुण निराकारांची भाषा ज्यांना कळली अशी एक लेखिका ‘आकांक्षा देशपांडे’. काही दिवसापूर्वी त्यांच्या ‘आकार निर्गुणाचा’ हे पुस्तक वाचलं आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन ध्यासाने व्यापलेल्या एका व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली, खरं तर आपला हा समाज ऑटिझम आणि डाऊन सिंड्रोमच्या मुलांना सहजासहजी स्वीकारत तर नाही, सहानुभूतीही दाखवत नाही तर उलट त्यांची कीव करणं, घृणा,तिरस्कार आणि लज्जा हेच कृत्य समाजाकडून केलं जातं. एवढंच नव्हे तर काही जन्मदाते, आप्तेष्ट देखील या मुलांना समजून न घेता त्यांचा रागराग करतात. अशा मुलांना आकांक्षा स हृदयतेने सांभाळते, शिकवते. त्या मनाची अनाकलनीय भाषा ती सहज जाणते, अंधाऱ्या आकाशावर मात करणारे प्रज्वलित दिवे’ या तिचा लेखातून तीन मुलांचं हरवलेले आयुष्या तिने ज्या पद्धतीने बदलवून टाकलं तेव्हा..
अमंत्रमं अक्षरं नास्ति न स्ति मूलमनौष धम
अयोग्य: पुरुष : नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:
या सुवचनाची प्रचिती आली.
मृत्यूसोबतची झुंज जिंकणारी कळी या लेखातून एक मुलगी निव्वळ मांसाचा गोळा.. की जिला डाऊन सिंड्रोम होता. जन्मजात गुद्ददवार नाही, दोन दिवसाची असताना ओपन हार्ट सर्जरी झालेली, तिला चावताही येत नव्हतं,दर दिवसाला तिचा एनिमा करावा लागायचा. स्वतःच्या पायावर उभे राहता येत नव्हतं. अशा मुलीला आकांक्षा ने जेव्हा रेमेडीयल थेरपी दिली व स्वतःच्या पायावर उभ राहायला शिकवलं. हळूहळू सेंसरी इंटिग्रेशन, ऑक्युपेशनल थेरपी बॉल थेरपी, ब्लॅंकेट थेरपी देऊन चालायला शिकवलं इतर ही अनेक उपचार केले आणि जेव्हा ती मुलगी शाळेत जाऊ लागली, डान्स ही करू लागली. हे दिव्यत्व पाहिल्यावर तिच्या आई-वडिलांची अवस्था अशी झाली की
या आधी आम्हा माहित नव्हते प्रिती आणि प्रगती
‘परी आज सुखाचा स्वर्ग लाभला जणू हाती’
आकांक्षाच्या विशेष मुलांच्या बाबतीत प्रत्येक बाबतीतलं वेगळेपण हे प्रकर्षानं जाणवतं. या मुलांची, पालकांशी जुळून घेताना समायोजनाची खरी गरज असते असं ती म्हणते. जिव्हाळा,आपुलकी, व प्रेमाच्या स्पर्शाला मुकलेल्या मुलांच्या जीवनाला समावेशक शिक्षणाने जगण्याचा अर्थ ती देते. स्वमग्नता बौद्धिक अक्षमता असलेल्या असणाऱ्या मुलांना हळुवारतेने ती जगण्याची वाट दाखवते. हावभाव, हातवारे अशा भाषेतून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्यातील कौशल्य विकसित करते. ज्या मुलांना सतत झि डकारलं जातं त्या मुलांना आपलंसं करणं जीवनात आणि कुटुंबात त्यांना प्रेम मिळवून देणं असं करून या निर्गुणाला आकार देताना आकांक्षा ही एखाद्या शिल्पकारापेक्षाही महान भासते.
निर्जीव दगडाला आकार देऊन त्यात केवळ सौंदर्य निर्माण करता येत पण सजीव असूनही सजीवतेचा अभाव असलेल्या निर्जीव जीवाला सगुण साकार करण्याचं काम आकांक्षा ज्या पद्धतीने करते त्यातून फक्त मानवतेचे दर्शनाच होतं असं नाही तर खास खळग्याच्या वाटा पार करीत कल्पनेपलीकडचं आयुष्य या जीवांना ती कसं प्रदान करते हे केवळ इतरांच्या सांगण्यातून नव्हे तर पुस्तक वाचनातून आपल्या लक्षात येतं.
आकांक्षा गेल्या वीस वर्षापासून नागपूर मध्ये ‘विशेष मुलांची शिक्षिका’ म्हणून कार्य करीत आहे. शिक्षिकेचं काम करताना त्यांनी ऑटिझम, डाउन सिड्रोम अवस्था, मानसिक व बौद्धिक अक्षमता, अपंगत्व सेरेबल पाल्सी अशा मुलांनाच नव्हे तर प्रौढांनाही शिकवण्याचं काम केलं. म्हणूनच तर ती विद्यार्थीप्रिय व पालकप्रिय शिक्षिका बनली. हे सर्व करत असताना कौटुंबिक समस्यांना, अडचणींना तोंड द्यावं लागलं. कुटुंबातील व्यक्तींचे पालन पोषण, ‘बाई ते आई’ हा प्रवास तिने तितक्याच दिव्यातून पार केला. हे सर्व करण्याचा आत्मविश्वास तिला घरच्यांनी दिला तिचा ध्यास आणि ध्येयासह तिला स्वीकारलं होतं, म्हणूनच तर ती ज्यांची समाजात हेटाळणी होते त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार देऊ शकली.
सीमाच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या या धाडसामुळेच तर, ती ‘वाळवंटातही स्वस्ती पद्म रेखाटू शकली’. आयुष्य अवघड असतं पण ते अशक्य नक्कीच नसतं त्यासाठी आपल्या प्रामाणिक प्रयत्ना वर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. तिच्या कर्तृत्वातून असं वाटतं की देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही तर तो आकांक्षा सारखी एखादी व्यक्ती घडवतो.. अशा या ‘निर्गुणाला आकार देणाऱ्या शिक्षिकेची ही यशस्वी वाटचाल अशीच वृद्धिंगत होत राहो..’
हिच परमेश्वरचरणी प्रार्थना
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहमदनगर