“मृत्यू हेच मानवी जीवनाचे शाश्वत सत्य असते”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
‘शामराव काका’ व ‘सिंधू मावशी’ म्हणजे आदर्शाचे दुसरे नाव. दोघे त्या काळात शिक्षक, शिक्षिका होते. सारे आयुष्य प्रामाणिकपणे काम करत, कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी अनेकांच्या आयुष्यात ‘ज्ञानाचा दिवा’ पेटवला होता. आयुष्यात एकच ध्येय ठेवलं होतं त्यांनी….मुलगी उषाचं आणि मुलगा संजयचे उच्च शिक्षण..! कधी पोटाला चिमटा तर, कधी शाळेनंतर घरच्या शेतात राब राब राबणे. प्रयत्नवादी माणसांची स्वप्न पूर्ण होतातच. मुलगी उषा लग्न करून अमेरिकेत गेली. तर मुलगा संजय जपानला जाऊन मोठ्या कंपनीत अधिकारी झाला. नाखुशीने का असेना, शामरावांचा प्रचंड विरोध पत्करून सिंधू काकींनी परदेशी सूनबाई पण स्वीकारली केवळ मुलाच्या मनाचा विचार करून.
“पाखरं उडती झाली की त्यांना घरट्याची तमा नसते” वर्षाकाठी येणारी दोन्ही मुलं दोन वर्ष, पाच वर्षे झाले तरी, घरापासून दूरच अगदी फोनसाठी पण त्यांना वेळ मिळेनासा झाला. मुलं म्हणजे म्हातारपणाची काठी असते, हे पण दोघे सोईस्कर रित्या विसरली. मृत्यू हेच मानवी जीवनाचे शाश्वत सत्य असते, याची ओळख काकींना तेव्हा झाली, जेव्हा अनेक वेळा फोन करूनही मुलगा, मुलगी बापाच्या अंत्यविधीसाठी पण आले नाहीत. शामरावांच्या मृत्यू समयी नवऱ्याच्या मरणाचे दुःख आणि अग्नीडाग कोण देणार या प्रश्नाने सिंधू काकींना ‘नरक यातना’ भोगाव्या लागल्या. काकांसाठी तरी किमान काकी होत्या, परंतु काकींच्या अंत्यसमयी महानगरपालिकेने बेवारस म्हणून अंत्यविधी करून त्यांना नरक यातनेतून मुक्त केलं. कधी थांबवणार हो आपले पैशांच्या मागे धावणे? संपत्ती कमावणे? आपल्या लोकांना गमावणे? जिवंतपणीच मनाला नरकयातना होतात असे काही पाहिले तर….!!
नववीतच होती ती…. जेमतेम पंधरा वर्षाची, त्या नराधमानं स्वतःच्या वासना क्षमवत तिला अकाळी मातृत्व दिले, आणि नरक यातना भोगत जिवंतपणीच मेली ती… कोण न्याय देणार आहे तिला सांगेल का कोणी? सावत्र होती ती…. तिचा काय दोष यात? म्हणून काय दुसऱ्या आईने खुरपीनं चटके द्यावेत हाताला ? का ?का ? म्हणून तिने नरक यातना भोगाव्यात??
मराठी सारस्वत मंडळी….!! किती? किती उदाहरणं देऊ मी? उघड्या डोळ्यांनी समाजात जर फिरलो; तर अशा अनेक घटना आपल्यास पहावयास मिळतात. ‘नरक यातना भोगून भोगून माणूस जिवंतपणीच मेल्याचे दुःख पचवतो’. कोण? कोण रोखणार हे सर्व ? आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी नरक यातना हा भावस्पर्शी विषय देऊन आपल्या सर्वांच्या भावनांना हात घातला.
प्रत्येकानं कोणत्या ना कोणत्या रूपात नरकयातना भोगलेल्याच आहेत, त्यांना शब्दबद्ध करणे तसं कठीण, पण शिलेदारी कुठलेच कठीण नसते. याची पुन्हा एकदा प्रचिती आली. अनेक सुंदर अशा रचनांनी समूहाचे प्रांगण फुललं. तेव्हा तुम्हा सर्व सारस्वत कवी कवयित्रींचे मनापासून अभिनंदन. खरे पाहता काही सारस्वत फक्त स्पर्धेच्या दिवशीच लिहतात. आम्ही त्यांच्या लेखणीचा सन्मानही करतो. परंतु, महिन्यातील सन्मानपत्रासाठी फोटो न पाठविणा-यांची यादी स्पर्धागणिक वाढतांना दिसते. सहप्रशासक, संकलक व परीक्षकांच्या या यातनाही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच कधी कधीच ‘मराठीचे शिलेदार’ समूहात काव्यलेखन करीत असल्याने काही महत्वाच्या शीस्तबद्ध सूचनांचे पालन करीत नसल्याचे जाणवते. आपल्या रचनांची दखल आम्ही नियमित घेतोच. कृपया आपणही नियमित लिहून ‘मराठी भाषा’ अधिकाधिक श्रीमंत करण्याची जबाबदारी उचलावी असे आम्हास वाटते. पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा..,!
सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह