“मन राम रंगी रंगले” संगीतमय मैफलीत उलगडणार रामायणातील सत्य
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: येत्या रामनवमीला प्रभू राम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम गीतांची संगीतमय मैफल ‘मन राम रंगी रंगले’ शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सायं. 5.30 वाजता भरतनाट्य मंदिर येथे योजला आहे.
प्रामुख्याने महर्षी वाल्मीकी लिखित रामचरितावर आधारीत या सर्व रचना असून ‘ठुमक चलत रामचंद्र’ अशा लोकप्रिय अभंग रचनांसोबत लोकप्रिय भाव गीते, चित्रपट गीते व संतवाणीतून प्रकटलेला श्रीराम अशा स्वरूपाच्या गाण्यांची गुंफण करून ज्ञान,भक्ती व मनोरंजन यांचा संगम असलेली ही मैफल आपल्या स्वरांनी सजवणारे गायक कलाकर आहेत.
प्रज्ञा देशपांडे,केतन अत्रे, अर्णव पुजारी, राजीव हसबनीस, प्रसन्न बाम आणि निरुपण करणार आहेत प्रसिध्द अभिनेते व दिगदर्शक रवींद्र खरे. या कार्यक्रमास डाॅ. राम साठे, विनय कुलकर्णी, अभय जबडे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नेहमीच्या मंचीय कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम थोडा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. रामायणातील अनेक प्रसंगांबद्दल जनमानसात असलेले कुतुहल,काही लोकोपवाद, काही दंतकथा आणि अनेक अनुत्तरीत प्रश्न या सर्व गोष्टींमागचा सत्य इतिहास निरूपणातून उलगडून सांगण्यात येणार आहे.
उदा. रावणवध दसऱ्याला झाला की अन्य तिथीला,14 वर्षाच्या वनवास कालावधीत माता सीता, नेमकी किती दिवस अशोकवनात होती, रामाच्या वानरसेनेतील वानर नेमके कोण होते, हिच वानरसेना समुद्रावर पूल बांधू शकते का, धनुषकोटी ते श्रीलंका हा रामसेतू फक्त 5 दिवसात कसा पूर्ण झाला, दशरथाची पट्टराणी कैकयी, ही खरंच “माता न तू वैरीणी” अशी खलनायिका होती का, रामाची लव-कुश ही दोन जुळी मुले सर्वांना माहित आहेत, पण लक्ष्मण,भरत, शत्रुघ्न यांची आपत्ये किती, रामाचे राज्य आणि रामाची राजनीती आजच्या वर्तमान राजकारणातही दिसून येत का, अशा अनेक प्रश्नांचे उलगडे या व्यासपीठावर होणार आहेत, अशी माहिती संयोजक संस्था भरत नाट्यमंदिरच्या वतीने विश्वस्त श्री रवींद्र खरे यांनी दिली. ही मैफल चुकवू नये असे आवाहन करून घरातील तरुण पिढीसह सहकुटूंब सह परिवार सर्व रामभक्तांनी उपस्थित रहावे, कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.