राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्षांचे वाढले ‘वजन’
_‘या’ 29 आमदारांवर अवलंबून आहे शिवसेना – भाजपाची प्रतिष्ठा_
मुंबई :- राज्यसभा निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीचा सामना रंगणार हे पक्के झाले आहे. भाजपचे तीन व शिवसेनेचे (Shivsena) दोन उमेदवार रिंगणात उतरविल्याने आता सेना व भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेकडून संजय पवार (Sanjay Pawar) तर भाजपने (BJP) धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेची उमेदवारी दिली आहे. दोघेही कोल्हापूरचे असल्याने कोल्हापूर (Kolhapur) या राज्यसभेच्या निवडणुकीच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. आता ही सहावी जागा साम – दाम – दंड – भेद या सगळ्यांचाच वापर करून पदरात पाडून घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सेना-भाजपला करावे लागेल हे मात्र निश्चित. अपक्ष आणि छोट्या पक्षांना एकदम या निवडणुकीने भाव आला असून मोठा घोडेबाजारही होणार असे संकेत मिळत आहेत. का वाढले अपक्ष आमदारांचे महत्त्व ?
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ४२ मते गरजेची आहेत . महाविकास आघाडीचा सत्तेतील बहुमताचा दावा हा १६९ आमदारांचा आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची एकूण संख्या १५२ इतकी आहे. यात शिवसेना -५५, राष्ट्रवादी- ५४ व काँग्रेस- ४४ असे संख्याबळ आहे . प्रत्येकी एक एक उमेदवाराची पहिल्या पसंतीची ४२ मते वजा केल्यास शिवसेनेकडे १३ , राष्ट्रवादीकडे १२ आणि कॉंग्रेसकडे २ असे एकूण २७ आमदारांचे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे . इतर पक्ष आणि अपक्ष मिळून १६ आमदार आघाडीसोबत आहेत . म्हणजे एकूण सहाव्या जागेसाठी ४३ आमदारांचं बळ कागदोपत्री महाविकास आघाडीकडे आहे .
यातही अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार का? याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची २७ मते तिसऱ्या उमेदवाराला जरी मिळाली तरी १६ अपक्ष आणि छोटे पक्ष काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे . अशा स्थितीत शिवसेनेला १५ मतांची गरज आहे. भाजपचा विचार केल्यास भाजपचे १०६ , रासप १ जनसुराज्य आणि ५ अपक्ष असे ११३ संख्याबळ भाजपकडे आहे . तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला १३ आमदारांची गरज आहे. या निवडणुकीत बऱ्याचदा कोटा पूर्ण होण्यासाठी आणि मते बाद झाल्यास, म्हणून अधिकची मतेही दिली जातात . अशा स्थितीत आमदारांची गरज वाढण्याचीही शक्यता आहे.
*शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा …*
अपक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला तरी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षाची भूमिका स्वतंत्र असू शकते. अशा स्थितीत २९ आमदार जे छोटे पक्ष आणि अपक्ष आहेत, त्यांच्यावर आता शिवसेना आणि भाजपाची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे.
*सस्पेन्स कायम…*
महाविकास आघाडी आणि भाजपा दोघांकडेही त्यांची स्वताचा सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते नाहीत. आघाडीला ४ आमदारांची तर भाजपाला १३ आमदारांची गरज आहे . अशा स्थितीत कोण नेमकं कुणाला हात देते , यावर ही सगळी निवडणूक रंगणार आहे . १० जूनला मतदान होईपर्यंत याचा सस्पेन्स कायम राहणार आहे . यात आता किती घोडेबाजार होतो, हे ही पाहावे लागणार आहे.
*सध्या कुणाची काय भूमिका*?
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीवर नाराज असल्याचे सांगितले असले तरी अंतिम निर्णय मतदानाच्या दिवशीच घेऊ असे त्यांनी सांगितले आहे . त्यांच्याकडे तीन आमदार . सपाच्या अबु आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे सूचित केले आहे . भाजपासोबत असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी अपक्षांनी पत्ते पिसलेले आहेत असा दावा केला आहे . आणि भाजपाचाच निवडून येईल असे त्यांनी सांगितले आहे . तर या निवडणुकीत भाजपा केंद्रीय यंत्रणांचा दबाव आमदारांवर टाकत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे . मात्र मतदानाच्या दिवशीच सगळं स्पष्ट होईल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल असा दावाही राऊतांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्या जागेच्या मतांची बेगमी झाल्याचे सांगत भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असे सांगितले आहे .