राज्यात एक कोटी तरुणांना देणार रोजगार
_वाढदिवसाच्या दिवशी नाना पटोले यांची मोठी घोषणा_
नागपूर/ भंडारा :- दोन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करून महाराष्ट्रीतील एक कोटी तरुणांना रोजगार देण्याचा काँग्रेसने (Congress) संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करण्याचा संकल्प आपल्या वाढदिवसानिमित्त करत असल्याचे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे काँग्रेसने नवसंकल्प अधिवेशन घेतले आहे. या नवसंकल्प अधिवेशनाच्या माध्यमातून जी भूमिका कॉंग्रेसने घेतली ती जनतेपर्यंत पोहचवणे आणि महाविकास आघाडी सरकारकडून करवून घेणे, असे अधिवेशनात ठरले आहे. केंद्राचा डाव चालू देणार नाही
शेतकरी हा देणारा असतो. परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मागणाऱ्याच्या भूमिकेत नेऊन ठेवले आहे. आता आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी दोन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करत आहोत; शिवाय इकॉनॉमीमुळे शेतकऱ्यांना ताठ मानेने जगता येणार आहे. याचबरोबर केंद्रातील सरकारने जाती-धर्मात द्वेष निर्माण केला आहे. परंतु, केंद्राचा हा डाव आम्ही चालू देणार नाही, असा संकल्प करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पटोलेंची भाजपवर जोरदार टीका
भारत हा कृषिप्रधान देश असून येथील शेतकरी हा नेहमीच देणाऱ्याच्या भूमिकेत असतो. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने याच शेतकऱ्याला मागणाऱ्याच्या भूमिकेत ढकलले आहे. केंद्रातील भाजप सरकार जाती-धर्मात द्वेष निर्माण करत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सरकारकडून करण्यात येत आहे, अशी जोरदार टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.