धनुष्यबाण सेनेकडेच; भात्यातील बाण कमी झाल्याने फरक पडणार नाही
मुंबई: “एकनाथ शिंदे गटातील काही लोक शिवसेना हा आमचा पक्ष असल्याचा दावा करीत आहे, याला काही अर्थ नाही, याबाबत कायदेतज्ज्ञांनी मत मांडले आहेत. जे लोक म्हणतात, की शिवसेना आमची, त्यांना तो अधिकार घटनेने दिलेला नाही. देशाच्या घटनेप्रमाणे एखाद्या पक्षाला असलेले अधिकारी, त्यांच्या विधिमंडळातील गटाला असलेले अधिकार याबाबत स्षष्टता आहे, मुळ पक्षालाच अधिकार असतात. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे शिवसेनेकडेच राहिल आणि त्यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडेच असेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्रसार माध्यमांना प्राप्त झाली आहे.
राज्यात सध्या नेमकी खरी शिवसेना कोणाची असा वाद सुरु असतानाच पक्षचिन्हावरुन दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गट धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही कायदेशीर लढाईची तयारी केली आहे. शिवसेनेचे नेते धनुष्यबाण आपल्याकडे ठेवण्यासाठी धावाधाव करीत आहेत. शिवसंवाद यात्रेतून अर्ज जमा करण्याची कसरत सुरु असून, भात्यातील कितीही बाण गेले तरी धनुष्य आमच्याकडेच असेल असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार व ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. अनिल देसाई म्हणाले, “शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना आमचीच आहे, असा दावा केला आहे, आयोगाने आम्हाला याबाबत पत्र पाठवून आमची बाजू मांडण्यास सांगितले आहेत, त्यानुसार आम्ही आमची बाजू मांडणार आहोत,”
“शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत, शिवसेनेला घटना आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हापासूनची ती घटना आहे, वेळोवेळी त्यात बदल केले गेले.त्याप्रमाणे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारीणी काम करते. पक्षाच्या घटनेनुसार सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे उद्धव ठाकरे यांना आहे. हे सर्व निवडणूक आयोगाकडे मांडले जाईल,” असे देसाई म्हणाले.