‘धुळवड’ अशी साजरी करता येईल का?
फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधीपूर्वक होळी पेटवली जाते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून ‘धुळवड’ खेळून नंतर आंघोळ केली जाते यास धुलिकावंदन, धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हणतात. तसं पाहता धुलीवंदन म्हणजे वाईट विचारांचा संहार करण्यासाठी गाईच्या पवित्र शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या एकत्र करून गायीचे तूप, कापूर, ऊस ,एरंडची फांदी या वस्तू जाळणे याला पुरणपोळीचा किंवा सर्व डाळी एकत्र असलेल्या पुरणाळ्याचीआहुती दिली की अग्निशांतीचेही पुण्य प्राप्त होते हा इतिहास आहे.
होळीच्या राखेपासून सुरू झालेल्या या सणात काल परत्वे आधुनिकता येणे अपेक्षित आहे,मला मान्यही आहे.पूर्वी नैसर्गिक पद्धतीने फुलांचे रंग बनवायचे. आता मात्र रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घातक रसायनांच्या अतिवापराने होळीच्या रंगांचा बेरंग व्हायला लागला आहे. कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम ब्रोमाइड, लीड ऑक्साईड, ऍसबेसटॉस यासारखी रसायने गंभीर स्वरूपाच्या आजारांना निमंत्रण देणारी आहेत. यातूनच विशेषतः डोळ्याच्या बाहुल्यांना त्रास होणे, रंग पोटात गेला की उलट्या जुलाब व संसर्ग या समस्यांना आमंत्रण देणे हे क्रमप्राप्त आलेच.
तेव्हा मी एकच विनंती करेन ,की हर्बल रंगांचा वापर करावा भले ते थोडे महाग असतील पण निश्चितपणे सुरक्षित आहेत. आमच्या दादरा नगर हवेलीच्या कर्मभूमीत फुलांपासून रंग बनवणारे अनेक जुने आदिवासी बांधव आजही हयात आहेत व दरवर्षी न चुकता तो ते रंग बनवतातच. पण, त्यांची खंत ही आहे की नवीन पिढीतले कुणीच ही कला शिकायचा प्रयत्नही करत नाही.
अजून एक महत्त्वाची गोष्ट….! रंगोत्सवात डीजे, डॉल्बीचा बेसुमार वापर… हल्ली एक फॅशनच झाली आहे. लहान मोठा कोणताही उत्सव असो, कर्णकर्कश डीजे जोवर सुरू होत नाही तोवर उत्सवाचा आनंद काहींच्या अंतकरणापर्यंत पोहोचतच नाही. माझा सण, उत्सव साजरा करण्याला अजिबात विरोध नाही. पण डीजे ,डॉल्बीचा फास म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण आहे. ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या हृदयावर ताण येणे, हार्ट अटॅक, स्ट्रोक याचा त्रास होऊ शकतो. रक्तदाब वाढतो, हार्मोन्सच्या पातळीत बदल होतो, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.गरोदर मातांना गर्भपाताचा धोका ही संभाव्य आहे.
नव्या पीढीसाठी हे सर्व थांबवणे आपल्या हातात आहे; आपण थांबवू शकतो. पण उत्सवातून आनंद मिळवण्याचा मार्ग आपल्याला थोडा बदलावा लागेल. थोडे प्राचीन परंपरेकडे जावे लागेल पूर्वीही लोक सण साजरे करतच होते. अगदी डीजे डॉल्बी नसताना. सनईच्या मंगल सुरात किती जादू आहे. कशाला हवा एवढा कर्कशपणा ? पाहूया जेवढे शक्य तेवढं करूयात तेव्हा तुम्हा सर्वांना एकच विनंती. सण, उत्सवाचा आनंद द्विगुणीत करत असतांना स्वतःच्या आरोग्याकडे पर्यायाने समाजाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेऊयात.
प्रशांत ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली