“महामानवाचं राष्ट्रीय स्मारक सर्वार्थाने सुंदर”; डॉ. मोहन भागवत
_सिम्बाॅसिस महाविद्यालयात डाॅ. आंबेडकर स्मारकास भेट_
_अमृता खाकुर्डीकर पुणे, प्रतिनिधी
पुणे: शोषणमुक्त समाजाचा पाया रचणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या एकात्मतेची सांगड संविधानाच्या माध्यमातून समता व स्वातंत्र्याशी घातली. या महामानवाच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे हे राष्ट्रीय स्मारक सर्वार्थाने सुंदर आहे, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “प्रेरणाभूमी” या स्मारकाला भेट दिल्यानंतर सत्कार समारंभात ते बोलत होते.
स्मारकाविषयी गौरोवोद्गार काढताना ते म्हणाले की, “या स्मारकाची वास्तू, त्यातील आठवणींचा मौलीक ठेवा मुजुमदार कुटुंबियांनी खूप सुंदररित्या जपला आणि मांडला आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन. हे स्मारक डॉ. आंबेडकरांच्या असंख्य आठवणींना उजाळा देणारे आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचे दर्शन घेवून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी.” या स्मारकासमोर भागवत यांनी यानिमित्त वृक्षारोपणही केले.
डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना स्मारकाच्या उभारणी संबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चारित्र्यवान नागरिक घडवतो, तसे उच्च शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी शिक्षित होतात, मात्र सुसंस्कृत होत नाहीत.” चारित्र्यवान नागरिक घडावा, यासाठी संघाने उच्च शिक्षण क्षेत्रात काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. डी. जोशी, काश्यपदादा साळुंखे, किशोर खरात, वेणू साबळे, क्षितिज गायकवाड, संघर्ष गवाले, विजय कांबळे, शरद शिंदे इ. कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.