मानवतेला प्राधान्य देण्यासाठी गरजेचे ‘समाजव्रत”; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण
एक आटपाट नगर होते. तिथे एक राजा राहात होता. त्याला दोन राण्या होत्या…..इथून सुरू झालेला व्रताचा प्रवास…! अशी ही व्रताची कहाणी सुफळ संपूर्ण…वर येवून थांबायचा. आम्ही सारे भक्तिभावाने मांडलेल्या त्या पुजेपुढे एकत्र बसायचो आणि मनोभावे समजून घ्यायचो. आजही मला माझ्या आजीचे ते कडक संकल्पचे सोळा सोमवारचे व्रत आठवते अन् त्याचा वारसा जोपासत आईने पुढे चालू ठेवलेले हे व्रत अन् भक्तिभाव मी स्वतः अनुभवला आहे.
व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नितीनियमांनी करावयाचे आचरण. होय पण या सर्व व्रतांच्या मागे निश्चितपणे स्वतःसाठी परिवारासाठी काहीतरी हवं असल्याची भावना असते . पण जेव्हा या व्रतासोबत समाज हा शब्द जोडला जातो; तेव्हा भाव पूर्णतः बदलतो आणि समाजाप्रतीची निष्ठा, समाजाप्रती असलेले देणे याला आपोआप प्राधान्य मिळते.व्यक्ती समाजाभिमुख वर्तनाच्या दिशेने आपली वाटचाल पुढे चालू ठेवतो.
समाजव्रत घेतलेले थोर भारतीय राजर्षि शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, गोपाल गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे,धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे ,डॉ. भीमराव रामजी आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,मदर तेरेसा,बाबा आमटे याअन् अशा अनेक समाजसेवकांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेचे व्रत जोपासले व अंतिमतः मानवधर्म श्रेष्ठ आहे हे समजून जात-पात सर्वांना तिलांजली देत केवळ मानवतेला प्राधान्य देत मानवतेच्या उद्धारासाठी काम केले.
दुसऱ्या बाजूला आपण हेही पाहतो की समाजव्रताच्या नावाखाली राजकीय चंचूप्रवेश करायचा आणि स्वतःची तुंबडी फाटेपर्यंत भरायची पण या लोकांना दुसऱ्याची कधीच परवा नसते..दूर कशाला जायचे ? मराठी भाषेच्या सक्षमीकरणाचे समाजव्रत मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी अंगीकारले , गेल्या दहा वर्षापासून तन-मन प्रसंगी स्वधन खर्च करून भाषा सक्षमीकरणाच्या यज्ञात अनेकाविध प्रयोग सर नेहमीच करतात हे खऱ्या अर्थाने समाजव्रत होय.
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने “समाजव्रत” हा आगळा वेगळा विषय देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा जणू मंत्रच दिलाय…हा लोकाभिमुख विषय देऊन त्यांनी अनेक कवी कवयित्रींच्या लेखणीला बळ देण्याचे काम केले.अर्थात अनुभव संपन्नता , ध्येयनिष्ठा याच्या जोरावर कवी कवयित्रींनीही विषयाला साजेसा न्याय देत अनेक रचनांच्या माध्यमातून आपल्या भावभावनांना वाट करून दिली. अनेक रचनांनी समूहाचं प्रांगण फुललं तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील साहित्यप्रवासास खूप खूप शुभेच्छा…!!
सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह