उद्वव ठाकरेंची औरंगाबाद सभा शिवसेनेसाठी महत्वाची का ?
औरंगाबाद: वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद येथील शिवसेनेचा बालेकिल्ला पाडला. पण आता महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री मराठवाड्यांतील जनतेला आणि औरंगाबादकरांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ वा वर्धापन दिनानिमित्ताने ही सभा असल्यामुळे त्या सभेला महत्त्वव प्राप्त झाले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे १९८५ साली स्थापन केलेल्या पहिल्या शाखेपासून शिवसेनेने मराठवाड्यात आपलं साम्राज्य निर्माण केलं. सध्या मराठवाड्यात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबादचे तर संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमध्ये दोनवेळा निवडून येत संसदेत औरंगाबादचं प्रतिनिधित्व केलेले आहे.
मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत जाहीर सभा घेऊन मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यभरातील वातावरण तापलं आहे. या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला होता. त्यानंतर एमआयएमचे तेलंगणातील खासदार असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतील खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण पेटलं होतं. त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. हे असे वातावरण असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.