वाईन शॉपच्या पाट्यावरील ‘वाईन’ नाव हटवा; किसान ब्रिगेड
नागपूर: मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना १७ डिसेंबर २०१९ ला किसान ब्रिगेडच्या वतीने पाठविलेल्या पत्रातील उल्लेख, वाईनला अबकारी विभागाऐवजी कृषी प्रक्रिया उद्योगात आणावे, अशी मागणी किसान बिग्रेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना १९ डिसेंबर २०१९ पाठविलेल्या निवेदनातून केली होती. वाईन संदर्भातील इंग्रज कालीन धोरण बदलून दारू दुकानांवरची ‘वाईन’ ही अक्षरे हटवून त्यावर “लिकर शॉप” असे लिहिण्याची सक्ती करावी , तसेच ’वाईन’ ला कृषी उत्पादनाचा दर्जा व विविध सवलती आणि अनुदाने देऊन वाईन उद्योेग हा खादी ग्रामोद्योगा अंतर्गत कुटिरोद्योग म्हणून भरभराटीला आणावा आणि शेतकरी समृद्ध करावा. यासाठी नियमात बदल करून ’वाईन’ला “अॅग्री हेल्थ ड्रिंक”चा दर्जा देण्यात यावा, अशी किसान ब्रिगेडची मागणी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
एकीकडे प्रकृतीला अत्यंत हानिकारक “टॉयलेट साफ करण्याच्या लायकीची” अनेक शीतपेये बाजारात खुलेआमपणे प्रतिष्ठेच्या नावाखाली विकल्या जात असतांना शुद्ध कृषी उत्पादन असलेल्या आरोग्यवर्धक वाईनच्या नशिबी मात्र असा वनवास का? असा सवालही प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे साखरेच्या औद्योेगिक मळीपासून तयार केलेली आणि फळांचा दुरुनही संबंध नसलेली आणि आरोग्यास अत्यंत घातक अशी दारू मात्र चक्क ‘संत्रा’, ‘मोसंबी’ ‘नारिंगी’ या नावाने शासनाच्या आशीर्वादाने खुलेआम विकल्या जात असल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले आहे. दरम्यान हेल्थ ड्रिंक असलेल्या वाईन संदर्भात प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी अनेक मान्यवरांचे दाखले तसेच जगातील विविध देशातील परिस्थिती काय आहे, हे आपण तपासून पाहू शकता, असेही निवेदनात म्हटले आहे.
वाईनला कृषी उद्योगाचा दर्जा देण्यासाठी किसान ब्रिगेडच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केल्या जाणार आहे, त्याअंतर्गत लवकरच अनेक जिल्ह्यात वाईन क्लब स्थापन करून ” वाईन फेस्टिव्हल” आयोजित केल्या जाणार आहेत. नागपूर येथे शरद फडणवीस यांच्या मार्गदर्शनात “नागपूर वाईन क्लब” मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे, आणि त्यांनी नुकतेच ४ व ५ डिसेंबर असे २ दिवस “आठवा” वाइन फेस्टिव्हल साजरा केला.
ज्याला समाजातील सर्वच स्तरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित स्त्री पुरुषांनी कुटूंबियांसोबत भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे वाईन संदर्भात प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल. सरकारने १७ डिसेंम्बर २०१९ रोजी केलेली आमची मागणी त्वरित मान्य केली नाही तर दारू दुकानावरील वाईन या नावावर काळा रंग मारण्याचे आंदोलन २५ डिसेंबर,२०२१ खिसमस पासून छेडण्यात येईल , ज्यामुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन देश तथा राज्याला शेतकरी रोष्यास सामोरे जावे लागेल, ज्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारवर राहील असा इशाराही पोहरे यांनी दिला आहे. आवश्यक असल्यास यासंदर्भात अधिक व्यापक चर्चा करण्याकरिता तज्ज्ञांना आणि समाजसुधारक लोकांना सोबत घेऊन किसान ब्रिगेडने मंत्रालयात सरकार सोबत बैठक घेण्याची तयारी दाखवली आहे.