राज्याच्या विधान परीषद निवडणुकीत फडणवीस ठरले हिरो
_महाविकास आघाडीचा धुव्वा_
मुंबई/ नागपूर: महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीने चांगलेच रण गाजवले. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीचा निकाल उशीरा का होईना हाती आला आहे. या अटीतटीच्या लढाईत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली असल्याचे नाकारता येत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा ‘हिरो’ ठरले आहेत. कारण भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रसाद लाड विजयी झाल्याने काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव झाला आहे. सुरुवातीच्या निकालात अपेक्षित निकाल लागले आहेत. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक तर भाजपाचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत.
तर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांच्यात चुरशीची लढत सुरु होती. मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपाचे प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांच्यावर मात करत विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपाचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले.
*मविआची वीस मते फुटली*
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे 113 आमदारांचे संख्याबळ असताना 133 मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली. अर्थातच महाविकास आघाडीची तब्बल २० मते फोडून फडणवीस हिरो ठरले असून, महाविकास आघाडीला हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
*विजयी कोण, कुणाला किती मते*
शिवसेना आमशा पाडवी : विजयी -26 मते, सचिन अहिर विजयी – 26 मते
राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे -विजयी-27 , रामराजे नाईक निंबाळकर विजयी- 26
भाजपा प्रवीण दरेकर – विजयी- 26 ,राम शिंदे – विजयी- 26 ,श्रीकांत भारतीय- विजयी- 26 , उमा खापरे – विजयी 26 , प्रसाद लाड – विजयी – 26
काँग्रेस चंद्रकातं हंडोरे – विजयी- 26, भाई जगताप- पराभूत 20 मते