‘ताकाला जाऊन भांडे लपवायचे काम करत नाही’; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
नागपूर: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत गेलो.आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवायचे काम करत नाही. आम्हाला विरोधी पक्षात बसायचे असेल तर आम्ही बसू. शिवसेनेला कुठे जायचे असेल किंवा कुणाला कुठे जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे.आम्ही विरोधात बसू.पण, महाविकास आघाडी आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे मोठे विधान कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहोत. आजही काँग्रेसचे आमदार हे महाविकास आघाडीसोबत आहेत, अशी ग्वाही दिली. आमची विरोधी पक्षात बसण्याची तयारी आहे सरकारला अजूनतरी धोका नाही, असे पटोले यांनी सांगितले.
*अजित पवार काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे*
माध्यमाशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला. ते म्हणाले की, पवार हे काँग्रेस आमदारांना त्रास देत होते. त्यांना निधी देत नव्हते. तसेच, काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला पैसे न देणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार होत होते. राज्यातील जनतेसाठी हे सरकार असून महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारावर अस्तित्वात आलेले आहे. सरकारने जनतेसाठी काम करावे, अशी आमची अपेक्षा हेाती. त्यातून आम्ही बोलत होतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आमची काही तक्रार नव्हती. आमचा व्यवस्थित समन्वय होता. त्यांच्या पक्षातील विषय आम्हाला माहीत नव्हता. मात्र, शिवसेनेतील बंडखोरीमागे ईडी आहे. कारण, त्या माध्यमातून विरोधातील लोकांना भीती दाखवले जात आहे. भाजपाचा हा खेळ आहे, असा आरोपही पटोले यांनी भाजपावर केला.
*दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड*
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी प्रकरणावरून मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून एक मीम शेअर करत भारतीय जनता पार्टीला खोचक टोला लगावला आहे. “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
“एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना वगळून सरकार हवे आहे. त्यासाठी भाजपसोबत युती करण्याचा शिंदे यांचा प्लॅन आहे. संजय राऊतांनी तुम्ही परत या, हवे तर राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून सरकार स्थापन करू, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील निर्णय हा शिवसेनेला करायचा आहे. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे”