शाळा व्यवस्थापन समिती, दत्तमांजरीच्या अध्यक्षपदी रितेश केंद्रे बिनविरोध
ज्ञानेश्वर पवार,माहूर/ प्रतिनिधी
माहूर: किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तमांजरी येथे दि.२ जुलै रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये रितेश विठ्ठलराव केंद्रे यांची ग्रा.प.सरपंच सौ. विमलबाई बळीराम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात आजघडीला नवनवीन बदल होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पैसे खर्च करुन खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यात अधिक रुची दाखवतात. मात्र दत्तमांजरी येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असताना देखील येथील शिक्षक वर्ग नेहमीच विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी धडपडत असतात.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती ही महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारत गावातील शाळेचा तालुक्यात व जिल्ह्यात नावलौकिक व्हावा या करिता कार्यरत असते. या अनुषंगाने समितीमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या उच्च शिक्षित व युवा अध्यक्षाची निवड झाल्याने गावातील शिक्षण घेणारे विद्यार्थी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होणार आहे. विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवड झाली व पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नूतन अध्यक्ष अविरत कार्य करतील असा विश्वास याप्रसंगी विद्यार्थ्याच्या पालकांनी व्यक्त केला.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये काम करत असताना शालेय कामकाजा बरोबरच शैक्षणिक क्रीडा, क्षेत्रात मुलांना सक्षम करण्यासाठी शाळा ही ज्ञानमंदिर आहे, इथेच उद्याची पिढी घडविण्याचे काम होणार आहे. त्यामुळे मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असल्याचे नुतन अध्यक्ष रितेश केंद्रे यांनी सांगितले. यावेळी मुख्यध्यापक यशवंत वाघमारे, ग्रा.सदस्य बंडू चव्हाण, उदय संगेवार, गणेश भारती, मारोती मोठे, संदेश वाघमारे, रमाबाई पाटील, शितल भारती सह शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.