फडणवीसांच्या नावामागे उपमुख्यमंत्री शब्द लावणे माझ्यासाठी ‘जड’; संजय राऊत
_देवेंद्र फडणवीसांच्या जखमेवर संजय राऊतांनी चोळले मीठ_
मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडी निरंतर चालू असतीलच परंतु उणे दुणे काढणे हे कधीच थांबणार नसल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे. संजय राऊत म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत बोलताना उपमुख्यमंत्री हा उल्लेख करणे जड जात आहे. त्यांना एक तर माजी मुख्यमंत्री अथवा भावी मुख्यमंत्री असे आपण सतत बोलत राहिलो. मात्र त्यांच्या नावाच्या मागे उपमुख्यमंत्री हा शब्द लावायला मला फार जड जात आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत काय झाले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
राज्यात शिवसेनेत दोन गट करून भाजपने सत्तेत एन्ट्री मिळविली असली तरी ज्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने शिवसेनेबरोबरील महायुती तोडली ते मुख्यमंत्रीपद मात्र देवेंद्र फडणवीस यांना मिळाले नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत पक्षात फुट पडल्याचे खापर फोडण्यात येत आहे. मात्र संजय राऊतांनी आज थेट देवेंद्र फडणवीस यांच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले.
राज्यात नवीन सरकार आले आहे. नवा गडी नवा राज. त्यांनी त्यांचे महाराष्ट्र व मुंबई संदर्भातील काम करावे. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईवरील शिवसेनेची ताकद त्यांना नष्ट करायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपला खांद्यावर बंदूक ठेऊ दिली आहे. मुंबईवर बाळासाहेब ठाकरेंचाच शिवसेनेचा झेंडा राहील. शिंदेंना मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्रीपदा दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही काही केले नसेल तर चौकशी यंत्रणांना तुम्ही सामोरे जायला हवे. त्याच आत्मविश्वासाने मी गेलो. आणि दहा-अकरा तासानंतर बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. त्यासाठी प्रयत्नही झाले. मात्र आम्ही गेलो नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेनेवर विश्वास ठेवणारे आहोत. जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. या राज्याची जनता, हजारो लाखो कडवट शिवसैनिक हे दूधखुळे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.