शिंदेगटाकडे नगर विकास खाते जाण्याची शक्यता, ११ जुलै पर्यंत होणार खाते वाटप
मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नवनियुक्त शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये खातेवाटपाचं सूत्र आधीच ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला 14 ते 15 तर भाजपच्या वाट्याला 26 ते 27 मंत्रिपद येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
_हे सरकार म्हणजे ‘फेव्हिकॉल’चा जोड; बच्चू कडू_
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार भक्कम असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. हे सरकार म्हणजे ‘फेव्हिकॉल’चा जोड आहे, असा दावा माजी राज्यमंत्री व अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, सत्तेत असूनही कुणी सहजासहजी बाहेर पडत नाही. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचलो होतो. त्यावेळी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. जेव्हा त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही मंत्रिपदाच्या किंवा पैशांच्या लालसेने शिंदे यांच्यासोबत गेलो नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या काही अपेक्षा असतात. सत्तेत राहून विकासाची बरीच कामे करता येतात, म्हणून आपण शिंदे सरकारला पाठिंबा दिला.