“राष्ट्रपती होणं माझं व्यक्तिगत यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे”; द्रोपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे,” असं सांगत पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व आमदार, खासदार आणि देशवासियांचे आभार मानले.
संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा शपथविधी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. “वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते. राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात,” असंही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
“स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे,” असं आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यानंतर देशाला संबोधित करत द्रौपदी मुर्मू यांनी आपला जीवनप्रवास मांडला. करोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाचं कौतुकही केलं.