जिविता पाटील यांना बेस्ट अंगणवाडी सेविका भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
सचिन पाटील, (अलिबाग)
रायगड:अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे – कातळपाडा गावातील सुकन्या तसेच नवीन वाघविरा येथील अंगणवाडी सेविका, समाज कार्यकर्ती जिविता सूरज पाटील यांना स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथे भारत सरकार तर्फे बेस्ट अंगणवाडी सेविका (सामाजिक कार्य) म्हणून भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजसेविका जिविता पाटील कुसुंबळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने त्यांच्यावर जिल्हा भरातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील तमाम अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले.
जिविता सूरज पाटील यांना वयाच्या २१ व्या वर्षी पदरात एका वर्षाचे मुल असताना वैधव्यपण आले तरी हिंमत न हारता शिक्षण सुरू ठेवले. वयाच्या अडचणींवर मात करीत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांचा भास आभास हा चारोळी संग्रह, काव्यकुंज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच ती चे अस्तित्व हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी एम. ए. एम.एस.डब्ल्यू तसेच सध्या त्या ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे एलएलबी च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. समाजकार्याची विशेष आवड जोपासत असताना तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशनची स्थापना केली. अनेक मुलींना खास करून आदिवासी मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले.
जीवाची पर्वा न करता गरजवंतांना तसेच कोरोनाग्रस्तांना सेवा पुरविण्याचे इतकेच नव्हे तर ५४ कोरोना ग्रस्त लोकांना स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना वेळप्रसंगी स्वत:चे दागिने गहाण टाकून मोफत जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम जिवीता पाटील यांनी केले. एक मानधनी अंगणवाडी सेविका कुठपर्यंत झेप घेवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिविता पाटील.
हा पुरस्कार माझा एकटीचा नसून महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी सेविकांचा आहे त्यामुळे येत्या अमृत महोत्सवासनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील माझ्या सर्व अंगणवाडी कार्यकर्तीचा सन्मान होणार असल्याचे मत जिविता पाटील यांनी व्यक्त केले तर त्यांनी त्यांना नेहमी साथ देणाऱ्या त्यांच्या सासू मनोरमा पाटील यांचे ऋण व्यक्त केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना मानाचा समजला जाणारा भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ जाहीर करून दिल्ली येथे त्यांना सन्मानपूर्वक सन्मानित केले जाणार आहे.