
….आणि समुद्र किनारा स्वच्छ झाला.!
_”पुनीत सागर” अभियानास उदंड प्रतिसाद_
अलिबाग : जे. एस. एम. महाविद्यालय,अलिबाग, 6 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. युनिट, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि डी. एल. एल. इ. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “पुनीत सागर अभियान” अंतर्गत आज अलिबाग समुद्र किनारा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी 6 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. युनिट, मुंबई चे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष अवस्थी, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. गौतम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अलिबाग नगरपरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे, एन. सी. सी. प्रमुख कॅप्टन डॉ. मोहसीन खान, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. सुनील आनंद, डॉ. सौ. मिनल पाटील, प्रा. सौ. गौरी लोणकर, एन. सी. सी. कॅडेट्स, एन. एस एस. स्वयंसेवक उपस्थित होते.
कर्नल मनीष अवस्थी यांनी विद्यार्थ्यांना ‘पुनीत सागर अभियानाची’ माहिती दिली. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे, तसेच आपला परिसर स्वच्छ राखणे हे आपले कर्तव्य आहे. महात्मा गांधीजीचे स्वप्न स्वच्छ भारत अभियानातून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेंव्हा प्रत्येकाने आपला परिसर व प्रदेश स्वच्छ ठेवून इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रवृत्त करावे असे आवाहन कर्नल मनीष अवस्थी यांनी केले.
त्यानंतर सर्वं कॅडेट्स व स्वयंसेवकांनी सागर किनारा स्वच्छ कारण्यास सुरवात केली. विदयार्थ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक, कचरा, प्लास्टिक बॅग्स, बाटल्या, एकत्रित करून त्या रिसयाकलिंगसाठी नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या. संपूर्ण समुद्र किनारा विदयार्थ्यांनी स्वच्छ करून नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला व उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व मोकळ्या जागी कचरा न टाकता कचरा हा डस्ट बिन मध्येच टाकावा असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘स्वच्छ सागर सुरक्षित सागर’ हे अभियान यापुढेही चालू राहणार आहे, ज्यामध्ये नजीकचे समुद्र किनारे स्वच्छ करण्याबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे. ऍड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगितले की, विद्यार्थ्याचा हा स्वच्छता उपक्रम एक देशभक्तीचे प्रतीक आहे.
या पुनीत सागर अभियानामध्ये अलिबाग, पनवेल, पोयनाड, आणि महाड येथील कॉलेजमधील एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. मोहसीन खान यांनी केले.