अबब!!!! रेकाॅर्ड ब्रेक अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वत्र पुराचे थैमान
प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: जिल्ह्यात काल रात्री बारा वाजता पासून सकाळ पर्यंत पावसाची संततधार सुरु असून काल मध्यरात्रीपासून अर्जुनी/ मोरगाव तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने मुसंडी मारली. स्थानिक अर्जुनीत
शेताव्यतिरिक्त गावात कधीच पाणी घुसत नव्हते. पण रात्रीच्या संततधारेमुळे गेल्या ४० वर्षातला पावसाने रेकाॅर्ड ब्रेक केलाय.
गोपालनगरात तर आज सकाळी अनेक घरात पाणी घुसले . इटियाडोहाचा कालवा गावच्या तलावाजवळून वाहतो. तलाव तर ओव्हरफ्लो झालेच; पण कालवा कधीच ओव्हरफ्लो झाला नव्हता. आज इतक्या वर्षात पाणी कालव्याच्या दोन्ही पाळींवरून गुडघाभर वर वाहत होते. त्यामुळे तलाव व कालवा दोन्ही दृश्य चित्तथरारक होते. त्यामुळे सर्व पाणी आजूबाजूच्या वस्तीत घुसले.
तालुक्यातील शितला माता मंदिरही पाण्यात अर्धे बुडाले. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्जुनीकडे येणारे लांखांदूर , गोंदिया वडसा महामार्ग , साकोली रस्ता, महागाव हे चारही रस्ते बंद झाले. पाटबंधारे विभागाने ग्रामस्थांच्या मागणीवरून कालव्याचे पाणी ताबडतोब बंद केले . तरीही अद्यापही पूर ओसरलेला नाही. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आले. पाऊस अजूनही सुरूच आहे. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी केला असून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.