📙हाच खरा ज्ञानोत्सव; सविता पाटील ठाकरे📙
ऐसी जिथे ज्ञानी l
मुनीश्वरांच्या उतान्ही ll
वेदा तरूच्या पानोवनी l
हिंडताती ll
🌷संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ….ज्ञानोपासक ज्ञानप्राप्तीसाठी वेद वचनांच्या पानोवनी हिंडतात, समग्रतेने भरून राहिलेल्या, ज्ञानाच्या पक्व फळात लगडलेल्या वेदवनात शिरतात. वेद कृपेने त्यांना ज्ञानाची प्राप्ती ही होते.परंतु ज्ञानाची व्याख्या करणे त्यांनाही जमले नाही. तरी असता माहितीचा साठा अनुभव व शिक्षणातून जमा केलेली शिदोरी जी असीम, अनंत व अविनाशी असते ते म्हणजे ज्ञान.
🌷दुसऱ्या बाजूला ‘उत्सव’ म्हणजे आनंदाला आलेली भरती होय. आपण ज्ञातच आहोत उत्सव म्हणजे सामुदायिक पूजा, विचारांचे आदान प्रदान, ऐकण्याची आणि राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणारे सामाजिक सुखाचा अनुभव घडून आणणारी मांदियाळी.
📙नुकताच आपण दिवाळी उत्सव साजरा केला आहे… दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीला पडलेले एक सुंदर स्वप्न होय. एक हजार वर्षाची परंपरा लाभलेल्या दिवाळसणात अंतरंगातील चंदेरी स्मृती उजळून जातात,मनातली जळमटं दूर सारली जातात व एक माणूस म्हणून जगण्याचं नवचैतन्य त्या दिव्यांच्या लांब लख्खदीप माळेप्रमाणे प्रत्येकात निर्माण होते.
अशा दीपोत्सवात दिवाळी अंक म्हणजे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंगच होय… १९०९ सालापासून चालत आलेली ही परंपरा आपण आजही जोपासत आहोत. मला आठवतं नुकत्याच लातूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मी म्हटलं होतं. भाषेची समृद्धी तिच्या साहित्यावरून ठरते हे मराठीचे शिलेदार समाजाचे सर्वेसर्वा राहुल सरांनी खूप आधीच ओळखलं होतं म्हणून दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी ते नेहमी आग्रही असतात, त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेला ‘साहित्यगंध दीपोत्सव’ अंकाची दुसरी आवृत्ती म्हणजे खरा ‘ज्ञानोत्सव’ होय.
🙏सारं आयुष्य एखाद्या मेणबत्ती प्रमाणे जळून बालकल्याणाचा वसा घेतलेल्या शिक्षण क्षेत्रातील खऱ्या हिऱ्यांच्या ओंजळीत शाबासकीच बळ टाकून त्यांच्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ वृत्तीला सलाम करणे. त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणं, त्यांचं कौतुक करणं हा खरा ज्ञानोत्सव होय.
✍️डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘शिक्षक हे विद्यार्थीनिष्ठ असावे”, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावे , ज्ञान समाजनिष्ठ असावे व समाज समतानिष्ठ असावा…. असा समतानिष्ठ समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून केलेला गौरव म्हणजे खरा ज्ञानोत्सव होय.
🌷इंग्राजलेल्या मानसिकतेमुळे मातृभाषेतून शिक्षण अडगळीत पडले आहे अशा बिकट परिस्थितीत सुद्धा मराठी साहित्यिकांची मायबोलीच्या सामर्थ्यावरील आढळनिष्ठा ,दृढ विश्वास व भाषेचा सार्थ अभिमान टिकून ठेवणारे कवी, लेखक, पत्रकार,परिक्षक,समीक्षक यांचा साहित्यगंध २०२२ पुरस्कार देवून केलेला सन्मान म्हणजे खरा ‘ज्ञानोत्सव’ होय.
🔹ते भले लेखक नसतील, कवीही नसतील, समीक्षक नसतील , परीक्षक नसतील. परंतु सुदामासारखी मित्रव्रत वृत्ती जोपासून दोन तारखेपासून चार-पाच तारखे दरम्यान राहुल सरांची सावली बनून त्यांची सर्वस्वी मदत करणारे नितेश दादा क्षीरसागर म्हणजे खरे ज्ञानोत्सव होय.
असो…!!!
✍️आज बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेच्या निमित्ताने ‘ज्ञानोत्सव” हा विषय देऊन मराठीचे शिलेदार समुहाचे सर्वेसर्वा राहुल सरांनी तुमच्यासोबत माझ्याही लेखणीला साद घातली मी कृतज्ञतेच्या भावनेने पाझरली..
💐अवलोकनार्थ कविता वाचताना तुमची तळमळ, प्रेम,नवीनता पाहून मन भरून आले. तुमचं मनापासून अभिनंदन..
सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/समीक्षक/मुख्य सहसंपादक
©मराठीचे शिलेदार समूह