
‘साहित्यिकांनी समाजाला जागृत करावे’;सुधाकर अडबाले
_विदर्भस्तरीय मराठी कवी संमेलन उत्साहात_
चंद्रपूर/गोंडपिपरी: राज्यात सध्याचे राजकीय वातावरण पक्षफोडीने गाजत आहे, तर साहित्यक्षेत्रात विविध ‘सवता सुभा’ अन् ‘कंपुगीरी’ माजत आहे. आयोजित विदर्भस्तरीय मराठी कवी संमेलनाचे उदघाटक मा. सुधाकर अडबाले यांनी समाजाला जागरुक करण्याचे काम साहित्यिक करीत असतात. त्यांनाही समाजाने जपावे असे मत मांडले. तर अध्यक्ष धनंजय साळवे यांनी फक्त चित्रपट अभिनेता हाच सेलिब्रिटी नसावा, तर समाजाला सजग करणारा साहित्यिक हा समाजामध्ये सेलिब्रिटी म्हणून गणल्या जावा असे मत मांडले.
वैदर्भीय मातीतील चंद्रपूर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात, जीवन गौरव मासिकप्रणित साहित्य परिवारचे समूह निर्माता तथा सहसंपादक गणेश कुंभारे व शब्दांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष व सहसंपादक दुशांत निमकर या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या ‘कलंदर’ व्यक्तींनी दोन्हीही संस्थाच्या संयुक्त विद्यमाने, गोंडपिपरी येथे ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे साहित्य मंच, धनोजे कुणबी समाज सभागृहात अतिशय नियोजनबद्धपणे विदर्भस्तरीय मराठी साहित्य संमेलन घडवून आणले.
संमेलनाचे ‘उदघाटन ते समारोप’ हा प्रवास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. मोठमोठ्या साहित्य संमेलनाचा ढिसाळपणा येथे मुळीच नव्हता, ही बाब विशेष कौतुकास्पद म्हणावी लागेल. उदघाटक म्हणून मा. सुधाकर अडबाले (सरकार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ) तर अध्यक्ष म्हणून कविमनाचे उपक्रमशील गट विकास अधिकारी धनंजय साळवे हे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून मा.प्रा.संतोष बांदूरकर यांनी भूमिका बजावली.
विशेष अतिथी म्हणून चेतनसिंग गौर नगरसेवक,श्रीकृष्ण अर्जुनकर (मु.का.अ.गृहलक्ष्मी महिला पतसंस्था गडचिरोली) राजेश ठाकूर चामोर्शी, कवी, प्रवचनकार चेतन ठाकरे आरमोरी, सौ.रेखा कारेकर राज्य पुरस्कार प्राप्त मु.अ.तर विपुल साहित्य संपदा असलेले ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साहित्य लेखन गौरव पुरस्कार देखील वितरित करण्यात आलेत. विदर्भस्तरीय मराठी कवी संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुशांत निमकर यांनी केले.
निमंत्रित कवी संमेलनाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत फिनिक्स साहित्य मंचचे अध्यक्ष तथा प्रख्यात कवी नरेश बोरीकर यांनी केले व रसिकांना खिळवून ठेवले. निमंत्रित कवींच्या कविताद्वारे रसिकांनी ‘कधी आसू तर कधी हासू ‘अशी आंदोलने अनुभवली. अहमदनगरचे कवी रज्जाक शेख यांनी रसिकांचे डोळे पाणावनारी ‘जात्यामंधी बाप तुहा,पिठामंधी माय’ ही रचना सादर केली. यवतमाळचे कवी विजय ढाले ‘एकदा तरी बळीचे सरकार आले पाहिजे…’ ही शेतकऱ्यांचा एल्गार पुकारणारी रचना सादर करून, रसिकांची भरभरून दाद मिळविली. अहमदनगरचे ग्रामीणकवी आनंदा साळवे यांनी सासू सुनेचे नातेसंबंध आपल्या कवितेतून ग्रामीण शैलीत मांडले.
कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘जंगलनोंदी’तील आदिवासीच्या व्यथा वेदना रसिकांना अंतर्मुख करून गेल्या. विजय वाटेकर यांच्या उपरोधीक मुक्तछंदाने रसिक काही क्षण अस्वस्थ झालेत. डॉ. किशोर कवठे, विनायक धानोरकर, विकास गजापुरे, रवींद्र गिमोणकर, डॉ. हितेंद्र धोटे, चेतन ठाकरे, मारोती आरेवार, विरेन खोब्रागडे,राजेंद्र घोटकर, प्रवीण तुराणकर, नेताजी सोयाम, दिलीप पाटील यांनीही आपल्या रचनामधून ‘अंगार आणि शृंगार ‘ मांडला व सभागृहात बहुसंख्येने उपस्थित रसिकांची दाद मिळविली. हिवाळ्याच्या थंडीतही रसिकांना कवितांची भरभरून उब या विदर्भस्तरीय साहित्यसंमेलनाच्या माध्यमातून अनुभवता आली. त्यानंतर नोंदणीकृत सहभागी ५० कवींचे कविसंमेलन मोठ्या थाटामाटात पार पडले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी झटनारे जीवन गौरव साहित्य परिवाराचे अर्चनाताई धोटे, विलास टिकले, उमेन्द्र बिसेन प्रा.भारत झाडे व शब्दांकुर फाऊंडेशनचे राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख, राकेश शेंडे, उषा निमकर, वृषाली जोशी,संभाशिव गावंडे, तानाजी अल्लीवार, सुशांत मुनगंटीवार, विघ्नेश्वर देशमुख, उज्ज्वल त्रिनगरीवार, सचिन दळवी,अरुण कुत्तरमारे, शीतल आकोजवार, अमृता पोटदुखे,अश्रका कुमरे, रामेश्वर पातसे, राहुल पिंपळशेंडे या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
उदाघाटनीय सत्राचे सूत्रसंचालन अर्चना जिरकुंटावर यांनी केले तर आभार प्रदर्शन शब्दांकुर फाऊंडेशनचे सचिव राजेश्वर अम्मावार यांनी मानले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झुंगाजी कोरडे,हिरामण सिडाम,आनंद चौधरी, इंद्रपाल मडावी, उज्वला अल्लीवार, अनु अम्मावार,रेणू अम्मावार,उज्वल त्रिनगरीवार,सचिन दळवी, देवानंद रामगिरकर, अरुण कुत्तरमारे, कोमरा अम्मावार यांच्या अविश्रांत परिश्रमामुळे हे विदर्भस्तरीय मराठी कविसंमेलन यशस्वीपणे पार पडले.