‘बंदीवान देहातून आत्मा मुक्त झालाच नसता’; स्वाती मराडे
बंदीवान… मातृभूमीसाठी कोण कोण बरं झालं होतं.. विचारांचं काहूर उठले नि एकेक नाव आठवत गेले.. सुरूवात झाली ती छोट्या शंभूराजांपासून.. पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले सुपूर्द करेपर्यंत मुघलांच्या छावणीत ओलीस राहिले.. नंतर महाराणी येसूबाई अवघा आठ वर्षांचा संसार संपला नि सुरु झाली मुघलांच्या छावणीतील कैद.. स्वमुलूख सोडून.. शत्रूच्या गोटात.. क्षणाक्षणाला आपण कैदी आहोत याची जाणीव करून देणारा सभोवताल.. अन् सोबत असलेल्या लहानग्या शाहूराजांच्या जीवाची काळीज पिळवटून टाकणारी काळजी.. एकेक पळ कसा काढला असेल त्या माऊलीने.. पण तरीही २९ वर्षे स्वतः ला कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले.. कोठून आणली असेल मनात ही ताकद.. होय मनाचीच ताकद..ती नसती तर बंदिवान देहातून आत्मा कधीच मुक्त झाला असता नाही का..?
स्वातंत्र्यलढ्याची पाने चाळली तर अगणित नावे नजरेसमोर येतील.. तुरूंगात असताना आपण आता मायभूमीसाठी काहीच करू शकत नाही यासाठी त्यांचा जीव तीळ तीळ तुटत असेल.. पण जेव्हा जेव्हा कुणा स्वातंत्र्यवीरांना तुरुंगवासात टाकले गेले तेव्हा तेव्हा लोकांच्या मनात एक नवे स्फुल्लिंग पेटले. इंग्रज कधीच क्रांतीच्या विचारांना ना कैदेत टाकू शकले.
कैदेत असताना व्यापून राहतं ते एक रिकामंपण.. या जगात वेळ कासवगतीने पुढे सरकत राहतो. रोजचं तेच तेच जगणं.. एकसुरीपणा.. कंटाळवाणा व गुदमरायला लावणारा एकटेपणा.. सोबतीला असतात केवळ स्वमनाचे खेळ.. हे मन कसे व कोणते वळण घेईल सांगणे कठीणच…
देह बंदिवान जरी
मन आकाशी फिरतं
कैद कोण करे त्यासी
कुणा हाती ना लागतं..!
पण तरीही भगतसिंग, सुखदेव, राजगुरू.. यांसारखे क्रांतीवीर जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांनी वाचनासाठी पुस्तके मागवली.. फासावर जाणार हे माहीत असूनही ज्ञानार्जनाची केवढी ही आस.. मनाला भटकू न देण्याची.. संयमाची कसोटी.. किती कुशलतेने हाताळली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सानेगुरुजी यांसारख्या विभूतींच्या हातून साहित्यनिर्मिती झाली. बंदीवान असूनही वेळ सत्कारणी लावला… मनातील कोणते भाव बंदीवान करायचे नि कोणते मुक्त ठेवायचे याची अचूक नस पकडली तर… तर जीवन एक सुरेख अनुभव होईल नाही का..!
आजच्या चित्रचारोळी स्पर्धेसाठीचा ‘बंदीवान’ विषय… तुरूंगवासाचे चित्र पाहून मन अनेक कैदेच्या कल्पनेत भटकून आले. चित्रसापेक्ष मातृभूमीसाठी अनेक रचना आल्या. अन् सोबतच लाक्षणिक अर्थाने आलेल्या काही रचना लक्ष वेधून घेणा-याच. चित्रसापेक्ष तर लिहायलाच हवे पण त्यापलीकडेही कवीमन शोध घेते याचा मनस्वी आनंद होतो. आपणा सर्वांची लेखणी अशीच बहुआयामी होत राहो.. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
स्वाती मराडे, पुणे
समीक्षक/मुख्य परीक्षक/कवयित्री