‘वेदनेतून जन्मते कविता’; कवयित्री संगीता बर्वे
_’प्रतिबिंब’ प्रकाशन समारंभ संपन्न_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: “कविता ही वेदनेतून जन्मते, ही वेदना सांभाळणे सोपे नसते. मनात आणि मेंदूत भावकल्लोळ उसळून येतो. एखादं विष भिनावं तसा एखादा विषय नसानसातून हृदयात भिनतो आणि मेंदूत धुमाकूळ घालू लागतो, जोपर्यंत ती कविता कागदावर उतरत नाही, तोपर्यंत कवीची या सृजनाच्या वेदनेतून सुटका होत नाही. अभिव्यक्तीची ही अंतरिक तळमळ कवीला सतत सांभाळून ठेवावी लागते. इतकी वेदना सोसणा-या कवीलाही खरं तर भोवतीच्या सुहृदांनी खूप जपायला हवं, पण सर्वसामान्यपणे तसं होताना दिसत नाही, परंतु मधुरा जोशी या भाग्यवान आहेत. त्यांची कविता त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने हळूवारपणे जपली म्हणून आज त्याचे “प्रतिबिंब” प्रत्यक्ष साकारले” अशा शब्दात प्रसिध्द लेखिका आणि कवयित्री संगीता बर्वे यांनी कवी आणि कविता यांचे नाते उलगडून दाखवले.
कृषी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. मधुरा जोशी यांच्या ‘प्रतिबिंब’ या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून संगीता बर्वे बोलत होत्या. कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांनी जुन्या नव्या कवींच्या कवितांचे दाखले देऊन उलगडून सांगितली आणि या संदर्भातल्या स्वतःच्याही काही कविता उदाहरणादाखल सादर केल्या. डेक्कन येथील गो.ल.आपटे सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द लेखिका डाॅ. माधवी वैद्य होत्या. याशिवाय, विचावंत व समीक्षक डाॅ. दत्तात्रेय तापकीर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुस्तकाच्या लेखिका डाॅ.मधुरा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या ” हे पुस्तक म्हणजे माझ्या मनाचे प्रतिबिंब आहे. कोराना काळातील आजारपणातून जणूकाही माझा पुर्न:जन्मच झाला. नव्याने आयुष्याकडे बघताना मन अंतर्मुख झालं, त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकात उतरलं आहे.”
डाॅ. तापकीर यांनी या निमित्त मनोगत व्यक्त करताना काव्यविषयक मौलीक विचार मांडले. ते म्हणाले ” कविता ही एक प्रभावी अभिव्यक्ती आहे.कवितेचे शब्द परमेश्वरी शक्तीकडे घेऊन जाणारे असतात. मनाच्या तळ्यात उमटलेलं सुंदर प्रतिबिंब म्हणजे मधुराताईंची हे पुस्तक आहे. हा लेखन आरंभ असून त्यांनी असेही पुढे लिहीते रहावे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना माधवी वैद्य यांनी सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती बघता हे वातावरण सावरायची जबाबदारी लेखक कवींवर आहे असे सांगून ” कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर असतात. संतमंडळीनी केलेली काव्यनिर्मिती जगाला मोठी शिकवण देणारी ठरली. मराठी साहित्यात एकापेक्षा एक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांचे काव्य आजही मनाला अतिशय आनंद देते” असे सांगून डाॅ. मधुरा जोशीं यांनी संसार आणि घरचा कृषी उद्योग सांभाळून लेखन कलाही जोपासली याबाबत त्यांचे कौतुक केले व पुढील लेखन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार श्री. राजेंद्र गिरीधारी व पुस्तक निर्मिती सहाय्यक श्री. विश्वास गद्रे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सरस्वती वंदना व पसायदान गायन माधवी पोतदार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ॲड. सिद्धी जोशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डाॅ. भाग्यश्री दुधाटे यांनी केले. श्रिया जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठीत नोटरीयन आणि जोशी दांपत्याचे मित्रपरिवार आवर्जुन उपस्थित होते.