
‘भाववाढ’ समाजात बंदिस्त विकृती निर्माण करीत आहे; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_
हवेत उडे
सिलेंडरचे भाव
उदरी घाव
मुख्य परीक्षक आ.वैशालीताईंचे हे रचनारूपी मर्म महागाईच्या भीषण झळांचे वास्तव रूप दाखवणारे सामान्यांच्या काळजाला घाव देणारी गॅस सिलिंडरच्या वाढत्या भाव उच्चांकाच्या भडक्याची ही धग..खरंच विचार करायला लावणारी व अंतर्मुख करणारी आहे.
‘अन्न’ ही माणसाची मूलभूत निकडीची गरज व ती पूर्ण करण्यासाठी सरपणाची गरज भासते. सरपणरूपी वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यायी व्यवस्था ‘मानवास’ एलपीजी घरगुती वापरायोग्य गॅसच्या रुपात गवसली.
एलपीजी म्हणजे मुख्यत्वे ब्युटेन, प्रोपेन व तत्सम घटकांनी मिळून बनलेले वायू अवस्थेतील हायड्रोकार्बनचे मिश्रण असते. हे कच्चे तेल (फ्रुड ऑईल)व नैसर्गिक वायू यांचे भंजन करून मिळवले जाते. दाब देऊन द्रव अवस्थेत रूपांतरीत केले जाते व ते गॅसच्या स्वरूपात घरोघरी वापरले जाते. इंडियनऑइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनसारख्या भारतातील अशा बऱ्याच कंपन्यांकडून पुरवठा केला जातो. व आय.पी.पी च्या बेंचमार्क ‘सौदी अरामको’ या जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीकडून तेल आयात केला जातो. त्यासाठी समुद्रमार्गे होणारे शिपिंग, विमा, कस्टम ड्युटी, बंदरभाडे,थकबाकी व देशांतर्गतही वाहतूक,मार्केटिंग खर्च,कंपनीचे मार्जिन शुल्क,बॉटनिंग चार्जेस, डिलर्सचं कमिशन,जी.एस.टी हे सगळं मिळून सिलेंडरची किंमत ठरविली जाते.
गॅस ही अत्यावश्यक बाब असल्याने प्रत्येकाला ती घ्यावीच लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाईच्या भडक्यात अक्षरशः होरपळून निघालेल्या सामान्य जनतेला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कंपन्यांनी व सरकारने इंधनवाढ करून महागाईचा नव्हे जीवन बरबादीचा झटका दिला.
सोसवेतना
महागाईच्या झळा
जीवन कळा
आधीच अवकाळी निसर्गाचा फिरलेला वरवंटा.त्यात भरीस भर गॅसच्या दराचा भडका.कित्येक कष्टकरी महिलांनी पै-पै जोडून उज्ज्वला गॅस सिलेंडर घेतलेला.. कामाचा ताण,धुराड्याच्या समस्या, वृक्षतोडीचा ऱ्हास थांबवावा हा उद्देश पण सरकारने त्याच्या किमती गगनाला भिडवल्या. सबसिडीही बंद झालेली त्यामुळे गृहिणींचं सगळं बजेट कोलमडलं. “तेलही गेलं.. तूपही गेलं हाती पुन्हा महागाईचं जीवघेणं सरपण हाती आलं”.फेब्रुवारीत अर्थसंकल्प मांडल्यावर महागाईपासून दिलासा मिळेल अशी सामान्य जनतेला आशा होती पण सिलेंडरचे भाव उलट दुपटीने वाढले.केंद्र सरकारला तिजोरीत वाढ करण्यासाठी गॅसचीच पोटावर घाव घालणारी बाब दिसली काय? सतत त्रुटीयुक्त अर्थसंकल्प मांडले जातात, जागतिकीकरणामुळे सरकारची हत्यारे काहीशी बोथट झाली आहेत, महागाई आटोक्यात आणणाऱ्या साऱ्या वल्गना एकतर्फी सक्रिय होऊन.. बंदिस्त विकृती निर्माण करताहेत.केंद्र सरकारच्या मानसिकतेची राजकीय किंमत आज सर्वसामान्यांना मोजून द्यावी लागत आहे. या नीतीतून मात्र सिलेंडर गॅस च्या महागाईच्या भडक्यात संसाराचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित…
याला जबाबदार कोण? गॅस विक्री मालक, कंत्राटदार?सरकार ?की मधली व्यवस्था? रखरखत्या उन्हात पुन्हा चुली अवतरतील की काय?
‘अच्छे दिन.. की मरण’ याचे पडसाद गृहस्वामिनींच्या त्रस्त मानसिक आविर्भावातून या ज्वलंत प्रश्नाचा आक्रोश व्यक्त करणारे चित्र आदरणीय राहुल सरांनी दिलेलं… यातील नेमका समर्पक मर्म प्रत्येकाच्या रचनेत आलेला.. महागाईची प्रत्येकाच्या मनात उठणारी ही खळखळती सल.. लेखणीतून धगधगत उमटले त्याचे वळ ..हेच तर आ. राहुल सरांना व परीक्षकांना अपेक्षित होते फळ.. अतिशय चपखलपणे सर्व सारस्वतांनी अप्रतिम, यथार्थ रचना साकारल्यात. विषयच इतका मर्मग्राही व ज्वलंत होता की सर्व मुख्य परीक्षक व शिलेदारांची लेखणी सामान्यांच्या उदरीचे घाव व्यक्त करण्यासाठी आपसूकच दामिनीगत उद्युक्त झाली.त्यासाठी सर्वांचे कौतुक व अभिनंदन 💐💐💐
असेच व्यक्त होत राहा ..लिहिते व्हा..
आ. राहुल सरांनी मला परीक्षणीय लेखणीची संधी दिली त्याबद्दल हृदयस्त ॠणानुभार 🙏
प्रा.तारका रूखमोडे, अर्जुनी मोर,गोंदिया
परीक्षक/सहप्रशासक/कवयित्री