
‘शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे’; एकनाथ शिंदे
_समान संधी केंद्र मोबाईल ॲपचे उदघाटन_
मुंबई: शिक्षण हे मानवी जीवनातील महत्त्वाचे आधारभूत घटक होय. खरे तर माणसांतील सुप्त कौशल्यांचा आणि सद्गुणांचा विकास साधला जातो, तो शिक्षणामुळेच, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. असे प्रतिपादन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे केले.
मुंबईतील चेंबूर परिसरात एक हजार मुला-मुलींचे विभागीय स्तरावरील वसतीगृहापैकी २५० मुलींच्या वसतीगृह इमारतीच्या उदघाटन प्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्यातील सर्व महाविद्यालयामधील ‘समान संधी केंद्र’ या उपक्रमाचे मोबाईल ॲपचे उदघाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहायक म्हणून व काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच ‘समान संधी केंद्रे’ सुरू करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागा मार्फत देण्यात आल्या आहेत.
उदघाटन प्रसंगी लोकसभा सदस्य राहुल शेवाळे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, समाज कल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि समाज कल्याण, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार प्रामुख्याने उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक आहेत. कला, क्रीडा, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात त्यांचा लाखमोलाचा वाटा आहे. आपल्या सगळ्या प्रजेला लिहिता-वाचता यावं आणि त्यांची स्थिती सुधारावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा त्याकाळी लागू केला होता.शाहू महाराजांनी समाजातल्या घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षण व्यवस्था उदयास आणली, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.