
‘मरणाच्या दारात जगणं शोधणा-यांनाच असते का? ‘आस मृगाची’; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
शिळ्या भाकरीचा घास
कृष खाई शिवारात
ऊन डोईवर घेई
कष्ट भिजते घामात
शेतकरी पितो कधी वारं
अंगी चढवितो नशा
बाप उनाड नभात
कशी पाझळतो आशा
कृषीक ढेकूळ मातीला
हात जोडून पाहतो
त्याच्या वांझोट्या रानात
दाणं कर्माचं पेरतो…
आस…अपेक्षा…. प्रत्येकालाच असतात ना?.. असाव्यातच ना…का नसाव्यात..?
रखमा : धनी,तुम्ही शेतात राब राब राबतात.. काळ्या आईची सेवा करतात.
रामा : अगं,आपला पेशाच आहे तो,आपण नाही तर कोण करणार शेती?
रखमा : खरं आहे तुमचं, पण मी काय म्हणते, यावर्षी सुलीचं लग्न करूया आपण.
रामा : अरे,होय करणारच, ती बघ कांद्याची चाळ भरून ठेवलीय तिच्या लग्नासाठी.
रखमा : ते खर आहे म्हणा.
रामा : सध्या भाव पडलेत गं, जरा भाव चढले की विकूया मग उडवूया लग्नाचा बार.
रखमा: पण तरी मला ना,भीतीच वाटते. गेल्या दोन-तीन वर्षापासून आपण पाहतो अवकाळी पाऊस अन् कांद्याचे पडलेले भाव यात पार मेला शेतकरी.
रामा: नको नको चिंता करूस,यावर्षी नाही होणार असं.आपली आस कसं बरं देव मोडणार.
तमाम सारस्वत दादा आणि ताई…
पुन्हा एकदा जानेवारी फेब्रुवारीच्या अवकाळी पावसात रखमा आणि रामाचे स्वप्न अक्षरशः वाहून गेले. मातीमोल भावाने तीन चार रूपये किलोने कांदा विकला गेला.
अन् पुन्हा एकदा पोरीच्या लग्नाच्या स्वप्नाचा पार चुराडा झाला.
मला खरचं कळत नाही या देशाचं ??
भिंतीना रंग देतो त्या मातीची किंमत चाळीस रुपये किलो आणि ज्या मातीत कांदा पिकतो तो चार-पाच रुपये किलो?? तर कसं होईल या बळीराजाचं ?कधी स्वप्नपूर्ती होईल त्याची? की असाच खितपत पडत राहील सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली ??.
अरे..एखाद्या वर्षी एखाद्या धंद्यात तोटा झाला की धंदाच बंद करणारी शेठ मंडळी कुठे आणि केवळ आपला पेशा आहे म्हणून त्या शेतीवरील प्रेमापोटी काळ्या आईला अंगा खांद्यावर झेलणारी ही मातीतली माणसे कोठे?? मरणाच्या दारात जगणं शोधणारी ही माणसे…हे जगतात केवळ आशेवर…
जून महिन्याचा प्रारंभ झाला. पुन्हा एकदा नव्या जोमाने सारं काही विसरून रामा अन रखमा कामाला लागलेत.कारण त्यांना ‘आस मृगाची’ आहे. मृग म्हणजे हरीण,पुढे दोन व मागे दोन पायांच्या तारका, मधला तारकापुंज म्हणजे डोकं मधल्या तीन ठळक तारका म्हणजे जणू त्या हरणाला लागलेला बाण अवकाशात ठळकपणे दिसतं. या नक्षत्रामध्ये या तारकांच्या आकाराचा असा काही योग जुळून येतो की, आकाशात मृग जणू स्वतःच अवतरतो .पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागते आणि मग मृग नक्षत्राचा लाल मखमली किडा पण अधून मधून डोकावूं लागतो.
आता शेतकरीही नव्या आशेने आपल्या घरातील लक्ष्मीसह कामाला लागतो.नांगरणी तर उन्हाळ्यातच झालेली असते पेरणी, कोळपणी सारं काही करतो तो.स्वतः जवळचं सर्व काही मातीमध्ये टाकतो कारण त्याचा विश्वास असतो तो वरच्या परमेश्वरावर. माझ्या एका दाण्याचे शंभर दाणे तो करेलच या आशेवर तो जगतो.
जगतो की मरतो माहित नाही पण पिढ्यानपिढ्या त्याच मातीत राबतो.
असे हे मृग नक्षत्र म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा आश्वासक काळ. आजपासून सुरू होणाऱ्या या नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खुणावले ते ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी. विषय अर्थातच होता बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी…’आस मृगाची’ हा विषय दिला आणि आपल्या कवी कवयित्रींनी पण त्यांचा विश्वास सार्थ करत विषयाला न्याय देत काव्यशेत असं काही फुलवलं की सुगीची चिंताच नको.आपल्या काव्यप्रतिभेला साजेसे असेच सारं..
‘आस मृगाची’ या विषयावरील परीक्षणार्थ रचना वाचतांना धरणी आणि पावसाचे मिलन दाखवताना कल्पकतेला सलाम करावासा वाटला. सर्वांनी खूप गर्भितार्थपूर्ण काव्य लेखन केले.
तप्त उन्हाच्या सोसूनिया ज्वाला
आस लागली मृगाची
वसुंधरा ही आता अधीर झाली
खरंच भेट व्हावी पावसाची.
पहा किती अर्थपूर्ण ओळी आहेत या.
पुन्हा एकदा आपण सर्वांनी विषयाला सखोल असा न्याय देवून खऱ्या अर्थाने काव्यस्पर्धा रंगवली तेव्हा आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.💐💐💐
सौ सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, लेखिका, कवयित्री