राजकीय लढाई न जिंकणारा ‘तो’ पाचवा गडी कोणाचा?
मुंबई : भाजपाने २० जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर पाचही उमेदवार विजयी होतील असा दावा भाजपाकडून करण्यात आला. मात्र, यानंतर राजकीय वर्तुळात ही लढाई न जिंकणारा भाजपचा ‘तो’ पाचवा गडी कोण असणार? याची चर्चा रंगली आहे.
*संख्याबळाचे गणित*
विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असणार आहे. सध्या विधानसभेत भाजपाचे १०६ आमदार आहेत. तर भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष चार आणि घटक पक्षाचे दोन असे मिळून एकूण संख्याबळ ११२ होते. या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येवू शकतात. तर उर्वरित चार मते गृहित धरल्यास आणि भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी आणखी २३ मतांची आवश्यकता आहे.
महाविकास आघाडी कडे एकूण १७३ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५३ तर कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीला नऊ अपक्ष आणि अकरा मित्रपक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा उमेदवार सहज निवडून येवू शकतात. मग भाजपा पाचही उमेदवार निवडून येतील असा दावा करत आहे. मात्र, संख्याबळानुसार भाजपाचे चार उमेदवार निवडून येवू शकतात. त्यामुळे पराभूत होणारा भाजपचा ‘तो’ पाचवा चेहरा कोणाचा? अशी चर्चा रंगली आहे.