गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडी गावच्या जंगल परिसरात आज 21 मे रोजी सकाळी 6 ते 7.30 या कालावधीत पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. तब्बल दीड तास चाललेल्या या चकमकीत कसनसुर दलमचे 13 नक्षलवादी ठार झाले आहेत. यात 6 पुरुष, तर 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे काही साहित्य व शस्त्र आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. शिवाय सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिस सध्या चौकशी करीत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे येऊन घटनेचा आढावा घेतला व पोलिसांचे अभिनंदन केले.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यातून नक्षलवादी मोठी आर्थिक खंडणी वसूल करतात. याच पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडीच्या जंगल परिसरात कसनसुर दलमचे सुमारे 60 ते 70 नक्षलवादी एकत्र आले असून तेंदूपत्ता हंगामाबाबत त्यांचे खलबते सुरू असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, नक्षल विरोधी अभियानाचे अप्पर पोलिस अधीक्षक मनीष कलवनिया, प्रशासन विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, नक्षलविरोधी अभियानाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी विशेष अभियान पथक पयडीच्या जंगलात रवाना झाले. त्याठिकाणी भल्या पहाटे शोध मोहीम सुरू होती. सकाळी 6 वाजताच्या सुमारास 60 ते 70 नक्षलवादी तिथे आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे दीड तास ही चकमक चालली. चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाले. त्यात 6 पुरुष व 7 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत आणखी 5 नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबविली असता, तिथे नक्षली साहित्य व शस्त्र सापडले असून ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सध्या या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.
गृहमंत्र्यांचा अचानक दौरा आणि घडली मोठी घटना
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्याचवेळी आजच ही मोठी घटना घडली. याबाबत गडचिरोली येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, गृहमंत्र्यांनी सांगितले की, मी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हापासूनचं गडचिरोली जिल्हा दौरा करायची इच्छा आणि उत्सुकता होती. त्यामुळे आपण हा दौरा केला. काल नागपुरात होतो, आणि आज गडचिरोलीत आलो. घडलेली घटना आणि आपला दौरा हा योगायोग आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील अडचणी समजून घेतल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्रात चांगली कामगिरी, छत्तीसगडमध्ये सुधारणेची गरज
महाराष्ट्र राज्यात नक्षलविरोधी अभियान सुयोग्यपणे सुरू आहे. नक्षल चळवळीला संपुष्टात आणण्यासाठी आपले पोलीस दल आणि गृहमंत्रालय उपाययोजना करीत आहे. मात्र शेजारच्या छत्तीसगड राज्यात नक्षल चळवळ काहीशी हैदोस घालत आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने आपल्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. याबाबत छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्र सरकार पत्रव्यवहार करेल, अशी माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोलीत दिली आहे.