उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारण्यासाठी आपण आग्रह धरणार असून एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमध्ये लोहखनिजाचे उत्खनन करण्यासाठी आपला कुठलाही आक्षेप नाही, आपण याबाबत सकारात्मक आहोत, अशी स्पष्ट भूमिका अहेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मांडली आहे.
गडचिरोलीत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हा हा उद्योगविरहित असा भाग आहे. त्यामुळे याठिकाणी उद्योग निर्माण करणे अत्यावश्यक आहे. उद्योग निर्माण झाल्यास रोजगार निर्मिती होईल आणि स्थानिक जनतेला रोजगार मिळेल. यातून विकास साधला जाईल, असे आमदार आत्राम यांनी स्पष्ट केले.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहप्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. येथील लोहखनिज उत्खनन करणे आवश्यक आहे. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प तयार झाल्यास गडचिरोली जिल्ह्याचा विकास साधला जाईल. त्यासाठी आपण आग्रही असून मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आपण लोहखनिज उत्खननाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जे लोक या उत्खननाला विरोध करीत आहेत, ते राजकीय विरोधात आहेत. त्यांना इथल्या लोकांना न्याय मिळवून देता येत नाही, त्यातून ते याबाबत विरोध करीत आहेत, हे चुकीचे आहे, असेही धर्मरावबाबा आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.