भंडा-यात उन्हाळी धान खरेदीचा गुंता कायम..!
_महाविकास आघाडी सरकाने धान खरेदीला लावले ग्रहण_
✍️खेमराज गि-हेपुंजे, लाखनी
भंडारा: जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय विषय ठरलेली धान खरेदी पुन्हा चर्चेत येत आहे. पणन विभागाकडून जिल्ह्यातील संस्थांना खरेदी करण्याचे उद्दीष्ट विभागणी करून देण्यात आले असून यामुळे होणारी खरेदी ही संस्थांची डोकेदुखी वाढवणारी असून, उन्हाळी धान खरेदीचा गुंथा कायम असल्याने, शेतक-यांच्या चेह-यावर चिंतेचे सावट पसरलेले दिसून येत आहे.
जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी करण्याचे आदेश २५ मे ला धडकताच खरेदी संस्थांनी खरेदीचे नियोजन सुरू केले होते. मात्र प्रत्येक्षात खरेदी सुरू होताच आलेल्या आदेशाने संस्था पेचात पडल्या आहेत. खरेदी संस्थांनी शेतकऱ्याची नोंदणी केली आहे. भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी साठी ४९१९९६.५९ क्विंटलचे उदिष्ट देण्यात आले, त्याची विभागणी सर्व खरेदी संस्थांना खरेदी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असून यानुसार २० ते २५ टक्के शेतकऱ्यांचे धान मोजणी होणार असल्याने, बाकी शेतकऱ्यांनी उर्वरित धान ठेवायचा कुठे आणि विकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. धान खरेदी केंद्र सुरू होताच शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत होता, मात्र लगेच आलेल्या दुसऱ्या आदेशामुळे यावर विरजण पडले आहे.
*शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग होणार?*
शेतात दिवसरात्र घाम काढून पिकविलेला माल विक्री होत नसेल तर, लागलेला लागवड खर्च काढायचा कुठून ? या प्रश्नात शेतकरी अडकला आहे. पिकलेला माल विकून नवीन हंगामाची तयारी करता येईल. या आशेने शेतकरी पूर्वतयारीला लागला होता, मात्र आता आलेल्या या आदेशामुळे अनेक शेतकरी खरेदीला मुकणार असून याचा परिणाम पुढील हंगामावर निश्चितच होणार आहे.
महाविकास आघाडी सरकार आले आणि धान खरेदीला ग्रहण लागले. मागील काही वर्षांपासून धान खरेदी ही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. कधी खरेदी केंद्र सुरू होत नाहीत; तर कधी गोदाम व बारदाना मिळत नाही हे सर्व झाले तर वेळेवर धानाचे चुकारे येत नाही आणि आता या हंगामात प्रथमच खरेदी करण्याचे उद्दिष्ट देत खरेदी सिमीत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती आक्रोश व्यक्त केला जात आहे.
आमच्या संस्थेत ४७० हेक्टर उन्हाळी धानाची नोंदणी झाली असून, त्यांची खरेदी अठरा हजार आठशे क्विंटल अंदाजित आहे. मात्र या विभागणीत तीन हजार चारशे क्विंटल खरेदी करण्याचे आदेश आहेत.संबंधित कार्यालयाने ही नोंदणी विभागणीनुसार थांबवायला हवी होती, मात्र तसे झाले नाही आणि आता खरेदीची अट घातली गेली आहे.त्यामुळे दोन्ही सरकारला विनंती आहे, की शेतकऱ्यांच्या या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा.
विनायक बुरडे,
अध्यक्ष विविध सेवा सहकारी संस्था जेवनाळा,
ता. लाखनी, जि. भंडारा
‘शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील खरेदी संस्थान उदिष्ट विभागणी करून दिली आहे. संस्थेचा कोटा पूर्ण होताच सिस्टीम बंद होणार आहे’.
‘भारतभूषण पाटील,’
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा