नॉट रिचेबल आमदार राजू पाटील म्हणताहेत, ‘ मी घोडा नाही’
मुंबई/ ठाणे: अपक्ष आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर इतर छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा शिवसेना (shivsena) आणि भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. एक एक आमदार महत्त्वाचा असल्याने या आमदारांभोवती सर्वच राजकीय पक्षांनी जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राजू पाटील (raju patil) गेले कुठे असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. पाटील स्वत: नॉट रिचेबल झाले की एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून ते नॉट रिचेबल झालेत अशीही चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसापासून मनसेने आघाडीवर टीका करतानाच भाजपचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मनसे भाजपला मतदान करणार की राजकीय गणितं पाहून आघाडीला मतदान करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर पाटील यांनी स्वत:हून ट्विट करून राज्यसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. पण आपण कुठे आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. चिंता नसावी, आमच्यासाठी मा. श्री.राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.
*काय होती चर्चा?*
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचंही मत मोलाचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की ठाण्यातील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार असा सवाल राज्यकीय वर्तुळात आहे. याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता झाला नाही. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील हे नॉट रिचेबल झाले आहेत.