मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताच भाजपात होते राजकीय एन्काऊंटर
_नीलम गोऱ्हेंचा भाजपवर घणाघात_
औरंगाबाद :- भाजपमध्ये (BJP) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली की त्याचा राजकीय एन्काऊंटर केला जातो. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे हेच झाले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) विधान परिषदेसाठी भाजपच्या सक्षम उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे भाजपने इतर उमेदवारांना विधान परिषदेची तिकीट देण्याऐवजी पंकजा मुंडे यांना द्यावी, असे सांगत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपला चिमटा काढला आहे. गोऱ्हे ह्या रविवारी औरंगाबाद येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी पाहाण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ठाकरे सरकारच्या काळात औरंगाबादला किती निधी देण्यात आला त्याचा पाढाच गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला. यावेळी विनोद घोसाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, रेणुकादास वैद्य यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा आणि औरंगाबादने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात हे लोकांना ऐकायचे आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण विषय असो अथवा अनेक विषयांवर मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.