
‘संभाजीनगर नामांतर हे तर आश्वासनाचे गाजर’; केशव उपाध्ये
औरंगाबाद: नामांतराचे गाजर दाखवून औरंगाबादच्या मुख्य समस्यांपासून नागरिकांचे लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा नेहमीचाच पोरखेळ पुन्हा ते खेळतील अशी हवा तयार केली जात आहे. औरंगाबाद शहराला पाणीटंचाईची समस्या सतत भेडसावत आहे. केवळ बैठका घेऊन आणि कागदी आदेश देऊन हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिक वसाहतीतील सुविधांचा अभाव, दहशत, खंडणीखोरी या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष वळवायचे आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही ही ठाकरेंच्या कारभाराची तऱ्हा महाराष्ट्र अडीच वर्षांपासून अनुभवत आहे. त्यामुळे आजच्या सभेत केवळ गाजरे उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही. अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
पर्यटन सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आज (८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची शिवसैनिकांकडून गेली कित्येक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिवसैनिकांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख केला आहे. मात्र यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मतदारांचा आणि सामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद बळकावलेल्या उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांनंतरची दुसरी सभा संभाजीनगरला होणार आहे. या सभेत ते या शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करणार अशा आश्वासनाचे गाजर सैनिक दाखवू लागले आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्याच गेल्या अडीच वर्षात जमले नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.