एकनाथ शिंदे यांचे नाराजीचे मुख्य कारण ‘हे’ आहे
मुंबई: शिवसेनेमध्ये नाराजीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांनी आपला सवता सुभा स्थापन केल्याचे दिसत आहे. सुमारे तीस आमदारांना घेऊन ते गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याची माहिती अजून निश्चित नाही. मात्र त्यांची नाराजी नेमकी काय याचा शोध घेतल्यास प्रमुख कारणे समोर येत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमागील प्रमुख कारण हे उद्धव ठाकरे हेच असल्याची चर्चा जोरावर आहे. उद्धव ठाकरे यांनीच सरकारची सगळी सुत्रे हाती घेतल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकार जेव्हा पडले. त्यावेळपासून नवीन सरकारची जुळवा-जुळव सुरू होती. त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला मोठे महत्व प्राप्त झाले. त्यावेळी त्यांची विधिमंडळ नेतेपती नियुक्तीही करण्यात आली.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असेच मानण्यात येत होते.एकनाथ शिंदे यांना जरी विधिमंडळ नेतेपदी नियुक्त केले तरी त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी काही लागली नाही. उद्धव ठाकेर यांनीच त्यावेळी ठाकरे घराण्यात इतिहास घडवला आणि स्वतःच मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्याचवेळी एकनाथ शिंदे नाराज यांना पहिली टोचणी लागली. विधिमंडळ नेतेपदी निवड होऊनही ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मात्र नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी महत्वाची खाती त्यांना देऊन त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अगदी निष्ठेने काम करुनही त्याचा उपयोग झाला नाही याचे हे मोठे शल्य त्यांच्या मनात असल्याचे मानले जात आहे.