
प्रधानमंत्री आवास योजनेला आज 7 वर्षे पूर्ण
_गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने केले विविध कार्यक्रमाचे आयोजन_
नवी दिल्ली: देशातील प्रधानमंत्री शहरी आवास योजनेला आज 25 जून रोजी 7 वर्षे पूर्ण झाले असून, तो दिवस साजरा करण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक आभासी कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जून 2015 रोजी या योजनेचा आरंभ झाला होता.
याप्रसंगी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव, तसेच केंद्रातील आणि राज्य सरकारांमधील संबंधित अधिकारीही यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला या योजनेच्या 7 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे चित्रण करणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. ही योजना लाखो भारतीयांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण करत आहे, मिशनच्या यशाची माहिती देणारे ई-पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात आले.
हे ई-बुक मंत्रालयाच्या संकेत स्थळावरून डाउनलोड करता येईल. आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून या मंत्रालयाने खुशीयों का आशियाना ही लघुपट स्पर्धाही सुरू केली होती. या स्पर्धेला संपूर्ण भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष करून योजनेचे लाभार्थी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी बनवलेल्या चित्रपटांद्वारे त्यांनी जीवन बदलवून टाकणारे अनुभव सांगितले. तीन श्रेणींअंतर्गत एकूण 34 सहभागी बक्षीसपात्र ठरले आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस आणि मान्यता प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रथम पारितोषिक 25,000 रूपये रोख, दुसरे 20,000 रूपये रोख आणि तिसरे 12,500 रूपये रोख रकमेचे आहे. विजेत्यांची नावे PMAY-U वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.
PMAY-U च्या अंमलबजावणीची यशस्वी सात वर्षे ही योजनेशी संबंधित प्रत्येकाने केलेल्या एकत्रित प्रयत्नाचे फलीत आहे. योजनेने भरपूर यश मिळवले आहे आणि अजून बरेच काही पूर्ण करून मोठा पल्ला गाठायचा आहे असे नागरी गृहनिर्माण सचिव म्हणाले. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या क्षेत्रात बांधकाम कामाला गती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.