मनातील संभ्रम दूर करण्यासाठी तरी माझ्यासमोर बसा; उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आवाहन
मुंबई: राज्यात बंडखोरीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटी येथे आहेत. शिंदे गटाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त संख्याबळ असल्याने उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संपर्क साधत आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. ‘कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही.’ असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत आघाडीत राहू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंकडे आमदारांचे संख्याबळ कमी असल्याने उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक ट्विट करत परत येण्याचे आवाहन केले आहे.
कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, असं उद्धव ठाकरेंनी ट्विट केले आहे.
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, असंही ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं आहे.