रेल्वेचे खासगीकरण किंवा विलिनीकरण नाही; रावसाहेब दानवे
कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी रेल्वेने बिनधास्त यावे कारण, त्यांच्यासाठी लागतील तेवढ्या जादा गाड्या सोडण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने केली आहे. आताच गणपती स्पेशल ट्रेनचे बूकिंग संपले असून वेटिंग लिस्ट आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे व वेटिंग लिस्टप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. रेल्वेचे खासगीकरण आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण होणार नाही, असे दानवे यांनी स्पष्टपणे सांगून अशा चर्चांना पूर्णविराम दिला.
श्री. दानवे यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गतवर्षीसुद्धा गणेशोत्सवासाठी रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याप्रमाणेच लागतील तेवढ्या गाड्या सोडू. भाविकांनी व चाकरमान्यांनी गावी कसा येऊ, याचा विचार करू नका. कोकणातून माल वाहतुकीसाठी जादा गाड्यांची मागणी व्हायला हवी आहे. माल वाहतूक हा रेल्वेचा आत्मा आहे. याकरिता आम्ही प्रस्तावाची वाट पाहतो आहोत. आम्ही प्रवासी वाहतूक करतोच; पण मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. भारतात कोळशाची १२०० ते २२०० रूपये टन असा दर आहे; परंतु परदेशातून कोळसा आणायचा झाल्यास हाच दर १० हजार रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे कोळसा उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोळशाअभावी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेला भाजपा द.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, ॲड. बाबा परुळेकर, प्रमोद जठार, राजन तेली, ॲड. विलास पाटणे आदीसह तालुका व शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.