चिमूर शहरातील, नेरी, भीसी पंपांवर इंधनाचा तुटवडा
चंद्रपूर: जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पानजिक असलेल्या जंगलाशेजारी असलेल्या चिमूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करणाऱ्या ऑइल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी अघोषित कोटा पद्धती लागू केली आहे. त्यामुळे शहरासह चंद्रपूर जिल्ह्यातील ४० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. अनेक पंपावर इंधन तुटवडा जाणवत असल्याने नागरीक त्रस्त असल्याचे चिमूर शहरात सर्वत्र चित्र पहायला मिळत आहे.
इंडियन ऑइल कंपनीचा इंधन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्यांनीही इतर कंपन्यांप्रमाणे पुरवठ्यावर निर्बंध आणल्यास येत्या काळात ही इंधन टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांसाठी असलेली क्रेडिट पॉलिसी बंद केल्याने इंधन टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या आधी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंपावर इंधनाचे टँकर खाली झाल्यानंतर पैसे घ्यायच्या, मात्र मागील काही दिवसापासून केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी क्रेडिट पॉलिसी बंद करत पंप चालकांकडून आगाऊ पैसे दिल्यासचे इंधन पुरवठा करण्याचं धोरण अवलंबल्याने पंप चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोटा पद्धतीमुळे काही पंप बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने शहरात इंधन संकटाचा सामना करावा लागतो आहे.
केंद्राने इंधनकरात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल मागे पेट्रोलियम कंपन्यांना प्रति लिटर २० ते २५ रुपयांच्या तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. कंपन्यांनी पूर्वी व्यवसाय वाढविण्यासाठी क्रेडिट पॉलिसी सुरु केली. आता अचानकच बंद केल्याने पंप चालकांची आर्थिक कोंडी झालेली आहे. आगाऊ पैसे भरल्याशिवाय पेट्रोल पंपांना इंधन देणं बंद केले आहे. यावर तोडगा न काढला गेल्यास येत्या काही दिवसांत ही इंधन टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
चिमूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. जेवढी मागणी आहे त्यापेक्षा कमी प्रमाणावर पुरवठा होऊ लागला आहे. पेट्रोल पंपावर तीन दिवसाचा स्टॉक असावा लागतो, परंतु कमी पुरवठा होत असल्याने पेट्रोल पंप ड्राय पडू लागले आहेत. हीच स्थिती सपूर्ण विदर्भासह राज्यात आहे.कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि दररोज वाढविले जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर वाढत नसल्याने पेट्रोलियम कंपन्यांची मोठी पंचाईत झाली आहे. लिटरमागे कंपन्यांना १५ ते २५ रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे या कंपन्यांनी उत्पादन थांबविले किंवा कमी केले आहे. याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर होऊ लागला आहे. राज्यभरात सध्या पेट्रोल पंपांना मागणीपेक्षा कमी प्रमाणावर इंधन पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती सुधरली नाही तर येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलची टंचाई जाणवू लागणार असल्याचे चिमूर येथील पेट्रोलपंप मालकांनी सांगितले.