ममाज बॉय.. आजच्या पिढीचा समज की गैरसमज?
माझ्या एका विद्यार्थीनीच्या लग्नाच्या आमंत्रणाला आम्हाला काही जाता आलं नव्हत. तीन चार महिने झाले तिचा काही फोन नाही, म्हणून मीच खुशाली विचारायला कॉल केला..”हॅलो ! टिचर कशा आहात तुम्ही? आणि लग्नाला का नाही आलात, मी किती वाट पाहीली तुमची” तीच्या बोलण्यातून आनंद व रुसवा दोन्ही जाणवत होताच. “अग हो..हो , मलाही बोलू दे की” त्यावर ती खळखळून हसली. ” तू कशी आहेस? आणि आमचे जावई काय म्हणतायत?” मी विचारल. ” मी एकदम मस्त..तो तर काय मस्तच असणार.” ती बोलली. तीच्या अशा उत्तराने मला थोडं आश्चर्य वाटलं. “म्हणजे गं ? सगळ आलबेल आहे ना तुमच्यात ? मी विचारल. “हो टिचर, तसा काही प्रॉब्लेम नाही, पण तो ना ममाज बॉय आहे.” ती म्हणाली. मी ऐकतच राहीले. क्षणभर काय बोलावं तेच कळेना. “अग तुमचा प्रेमविवाह ना.. मग तुला हे माहीत नव्हत का ? तो तुझ्याशी कसा वागतो” मी काळजीने विचारलं.
अहो टिचर , तसा तो खूप चांगला आहे. मला खूप सांभाळून घेतो, माझ्या आवडी निवडी जपतो. पण त्याला ना त्याच्या आईला बोललेलं आवडत नाही. प्रत्येक गोष्टीत आईची काळजी घेत असतो. त्यांनी औषध घेतली का, जास्त दगदग करत नाही ना, व्यवस्थीत जेवतात ना वगैरे वगैरे.. आणि आई पण त्याला कोणत्याच गोष्टीत रागावत नाहीत. तो स्वता:ची काम स्वत: करतच नाही.आईंनी लाडावून ठेवलंय नुसत त्याला. मला त्याच्या या गोष्टींचा राग येतो म्हणून मी त्याला ममाज बॉय म्हणते.” तीच हे बोलणं एैकून मी कपाळावर हात मारला.
कॉलेजचा मुलींचा ग्रुप असो,नोकरी करणाऱ्या मुलींचा ग्रुप असो किंवा नवविवाहीत तरुणींच एकमेकांशी गप्पा मारणे असो एक वाक्य हमखास माझ्या नेहमीच कानी पडत ते म्हणजे “तो ममाज बॉय आहे”. (ममाज म्हणजे आईचा आणि बॉय म्हणजे मुलगा) आता मला सांगा, मुलगा आईचा नसणार तर कोणाचा असणार हो. असो, हा विनोदाचा भाग सोडला तर या वाक्याच गांभीर्य मात्र वेळीच लक्षात घ्यायला हवं..हा विषय तसा एका लेखात मांडता येण्यासारखा नाही. मला हा विषय थेट सुध्दा मांडता आला असता; परंतु आजच्या पिढीने त्याविषयी जी मनात व्याख्या तयार केली आहे ती मला नेमकी मांडायची होती म्हणून पुढच्या अंकात हा विषय सविस्तर हाताळू. आणि या विषयावर होणारे समज गैरसमज ही आपण पाहू.
अर्चना सरोदे
सिलवासा,दादरा नगर हवेली आणि दमण व दीव