…तर उद्धव ठाकरेंना भाजपशी बोलावं लागेल; केसरकर
मुंबई: मागील अडीच वर्षांपासून राज्यात महविकास आघाडी सरकार अस्तित्वात होती. भाजपकडून या अडीच वर्षात आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल, दोन महिन्यांनी सरकार पडेल अशा अनेक तारखा देण्यात आल्या.मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीच केलेल्या मोठ्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला आली. आणि शिंदे गट आणि भाजपची युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.
अर्थात हा निर्णय ही सर्वांना आश्चर्यजनक वाटला होता, मात्र आता या निर्णयानंत दीपक केसरकरांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला परत बोलावलं तर तुम्ही जाणार का? यावेळी दीपक केसरकरांनी ठाकरेंना थेट बजावले की जर आम्हाला परत बोलवायचं असेल तर तुम्हाला आधी भाजपशीही चर्चा करावी लागेल.
*केसरकर नेमकं काय म्हणाले?*
दीपक केसरकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुलगी पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांना परत आणताना त्यांच्या कुटुंबप्रमुखाची ही परवानगी घ्यावी लागते. त्यांच्याशी चर्चा करावी लागते, आता भाजप आणि शिंदे गटाची युती झालेली आहे. सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल. फक्त आमच्याशी चर्चा करून चालणार नाही असं थेट केसरकारांनी ठाकरेंना बजावलं आहे.