
चिखलात रुतलेल्या ऑटोला ‘माजी मंत्री’ धक्का देतात तेव्हा !
_आमदारांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने_
सुबोध चहांदे, नागपूर
नागपूर: रस्त्यात प्रवास करीत असताना कधी कधी एखादे वाहन बंद पडते किंवा खड्ड्यात अडकते. अशावेळी त्या वाहनातील प्रवासी किंवा रस्त्यावर त्यावेळेस उपस्थित संवेदनशील नागरिक त्या वाहनाला धक्का देतात आणि काही क्षणात ते वाहन धावू लागते! हा तसा नेहमीचाच प्रसंग. मात्र वाहनाला धक्का द्यायला चक्क माजी मंत्री आणि विद्यमान आमदारच धावून आले तर ?
आज नागपुरात आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ही घटना घडली! आपल्या मतदार संघात कामाची पाहणी करण्यासाठी फिरणारे आमदार आणि माजी मंत्रीच शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ऑटो रिक्षाला धक्का द्यायला धावले तेव्हा त्यांच्या संवेदनशीलतेने सर्वांचीच मने जिंकून घेतली!
ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर जराही उसंत न घेता डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या उत्तर नागपूर मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात जनतेच्या अडीअडचणी समजून घेवून त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत आहेत. मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा आज आढावा घेत असतानाच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते सामील झाले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी यादवनगर भागातील भीम चौकात भेट दिली. त्यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलात शालेय मुलांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा अडकून पडलेली त्यांना दिसली.
हे दृश्य नजरेस पडताच संवेदनशील डॉ. राऊत हे शाळकरी मुलांबद्दलचे प्रेम व काळजी वाटून भावूक झाले. त्यांनी लगेच आपल्या गाडीतून खाली उतरून ऑटोरिक्षावाल्याला मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः ऑटोरिक्षाला धक्का देऊन ती चिखलातून बाहेर काढली. चक्क स्थानिक आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जा मंत्री ऑटोला धक्का देत आहेत हे पाहून परिसरातील लोकही आश्यर्यचकित झाले. रिक्षा पुन्हा धावू लागताच ऑटोरिक्षातील विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून डॉ. राऊत यांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि आनंद हे भाव फुलून आले.
डॉ. नितीन राऊत यांनी मदतीची तत्परता आणि संवेदनशीलता दाखवून उपस्थितांची मने जिंकली. कुठलाही आविर्भाव मनात न ठेवता सामान्य जनतेच्या मदतीसाठी कायम धावून येणाऱ्या डॉ. राऊत यांच्यासारख्या नेत्याचे हे रूप बघून दीपक खोब्रागडे, मुन्ना पटेल, जितेंद्र चव्हाण, रितेश जगताप हे काँग्रेस कार्यकर्ते देखील भारावून गेले.