वैभव नगरमध्ये नागरिकांच्या घरा समोर साचते घाण पाणी.
_नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात_
गजानन ढाकुलकर
हिंगणा – वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत शालिनीताई मेघे दवाखान्याला अगदी लागुनच असलेल्या वैभव नगरमध्ये काही घरांना नगर परिषद ने सांडपाणी सोडायला नाली अद्यापही उपलब्ध करून न दिल्यामुळे तेथील एका घराच्या समोर दररोज घाणेरडे सांडपाणी जमा होत आहे.त्यामुळे आजुबाजुच्या घरातील नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उपराजधानीला अगदी लागुनच असलेली वानाडोंगरी गट ग्रामपंचायत ही चार वर्षापूर्वी नगरपरिषद झाली.नगरपरिषद झाल्यामुळे साहजिकच जनतेच्या अपेक्षा वाढल्या परंतु अधिकारी व पदाधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे नगरपरिषद होऊनही पाहीजे तसा विकास होत नसल्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे.वैभवनगरमध्ये काही घरांना सांडपाणी सोडायला नाल्या नसल्यामुळे विनोद दुपारे यांच्या घरासमोरच समोरच्या घराच्या संरक्षण भिंतीला लागुन तीनचार घरांचे सांडपाणी दररोज जमा होत आहे. या घाण पाण्यामुळे नागरिकांचे जिवन जगणे कठीण झालेले आहे.हे पाणी दुर्गंधीयुक्त व आरोग्याला धोकादायक असून त्याच पाण्यातुन चालावे लागते.तसेच आजुबाजुच्या घरोघरी तापाचे रुग्ण वाढत आहे.विनोद दुपारे व त्यांच्या जवळच असलेल्या नागरिकांनी दोन ते तीन महिण्यापुर्वी नगरपरिषदेत तक्रार दिली.परंतु नेहमी प्रमाणे एकही अधिकारी किंवा प्रभागातील पदाधिकारी इकडे फिरकले नाही.पन्नास हजारापर्यंत लोकसंख्या असलेली ही नगरपरिषद आहे.नगराध्यक्ष , उपाध्यक्ष आहेत,वेगवेगळे सभापती आहेत,नगरसेवक आहेत, शासनाचा गलगट्ट पगार घेणारे मुख्याधिकारी आहे व त्यांच्या हाताखाली अनेक कर्मचारी आहेत.पण जनसमस्यांची दखल घ्यायला कुणीही तयार नाही.नागरिकांनी आपल्या समस्या कुणाला सांगायच्या ? असा यक्षप्रश्न जनतेसमोर आहे.साचलेल्या घाण पाण्याची दुर्गंधी स्वयंपाकघरापर्यंत येते.जेवताना सुद्धा दुर्गंधी येते.संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी त्वरीत दखल घेऊन ही समस्या सोडवावी. अशी त्रस्त जनतेची मागणी आहे.