वेताळभट्ट
दूरदर्शनवर “विक्रम वेताळ” नावाची रामानंद सागर यांची मालिका लागायची. ही मालिका कोणाला आठवो किंवा न आठवो पण विक्रमादित्य राजांच्या मानगुटीवर बसलेला वेताळ हे चित्र मात्र सगळ्यांना आठवत असेल. हा वेताळ पण कसा तर पांढरे केस, सामान्य माणूस वाटणार नाही असा चेहरा. पिशाच्च म्हणजे कोण तर हा वेताळ, असं जणू वाटावं.
पण हा वेताळ म्हणजे खरंच एखादं भूत होता का ? या वेताळाचं नाव होतं, वेताळभट्ट. एका भूताकडे पांडित्य होतं ?? तर हो. ज्याला आज लोक एक भूत पिशाच्च म्हणून ओळखतात तो एक अतिशय ज्ञानी भट्ट होता. या ऐतिहासिक पंडितांची प्रतिमा वर्तमानात खराब करून टाकली आहे. विजयनगर सम्राट श्रीकृष्णदेवराय यांच्या दरबारात नवरत्ने होती, तशीच सम्राट विक्रमादित्य राजांच्या दरबारातही नऊ रत्ने होती. पण आपल्याला कोणाची नवरत्ने माहीत आहेत, तर अकबराची. आपल्याला कॉपी कॅट अकबर आणि त्याची ९ रत्ने माहीत आहेत पण नवरत्ने ही संकल्पना मूळची ज्या हिंदू राजांची, ते हिंदू सम्राट आणि त्यांची रत्ने आपल्याला माहीत आहेत का ? तर नाहीत.
विक्रमादित्य राजांच्या या नऊ रत्नांमधील एक रत्न होतं, वेताळभट्ट. कोण होते हे भट्ट ? हे एक साहित्यिक होते आणि यांनीच ‘वेताल पञ्चविंशतिका’ हा ग्रंथ लिहिला होता. याच ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीवरून रामानंद सागर यांनी मालिका तयार केली होती. पण हे वेताळ भट्ट फक्त साहित्यिक नव्हते तर हे भूत – पिशाच्च यांच्या साधनेत तरबेज होते. उज्जैनच्या स्मशानात ते साधना करायचे आणि या साधनेद्वारे ते विक्रमादित्य राजांना त्यांच्या शौर्यात मदत करायचे. त्यांची ही साधना आणि त्यातील राजा विक्रमादित्यांची भूमिका यावर त्यांनी वेताल पञ्चविंशतिका हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. वेताळभट्ट हे कितीतरी तांत्रिक विद्या, शक्ती, अस्त्र यात निपुण होते. याच विद्येच्या सहाय्याने विक्रमादित्य राजांनी अग्निवेताळाला आपल्या नियत्रणात आणलं होतं. हा वेताळ राजांना वेळोवेळी मदत करायचा. वेताळभट्ट यांच्याच सहाय्याने विक्रमादित्य राजांनी राक्षस, असुर, वाईट शक्ती यांचा सर्वनाश केला होता.
वेताळभट्ट यांचा हा इतिहास आज फारसा कुठे आढळत नाही. लिखीत नोंदीही फार नाहीत. वेताल पञ्चविंशतिका हा मूळ संस्कृत ग्रंथही आता अस्तित्वात नाही, त्यामुळे या वेताळभट्ट महोदयांची लोकांना खरी ओळखच नाही. पण लोकांना काय माहीत आहे तर, हा वेताळ म्हणजे कोण तर, विक्रमादित्य राजांच्या मानगुटीवर बसलेलं स्मशानातील भूत. आज हीच यांची ओळख जगाला माहीत आहे.
राजा विक्रमादित्यांची उज्जैन ही राजधानी होती. या राजांच्या स्मरणार्थ उज्जैन नगरी त्याचं स्मारक उभं केलं आहे. तिथे त्याच्या दरबारातील नवरत्नांनाही जागा दिली आहे, त्याच स्मारकातील वेताळभट्ट यांची ही प्रतिमा.
– मंजुषा जोगळेकर