मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलंय; चंद्रकात पाटील
_शिंदे – फडणवीस सरकारमध्ये आलबेल नसल्याचे चित्र_
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई: महाराष्ट्रात अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पायउतार व्हावं लागले. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार आले आहे. मात्र अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने भाजप आणि शिंदे गटात काही आलबेल नाहीच अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस मानलं जातं होत मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता काही दिवस उलटत नाही तोच चंद्रकांत पाटील यांच्या या खळबळजनक विधानांनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते किंवा युतीवर काय परिणाम होतो हे सुद्धा पहायला हवं.